कर्नाटकातील सध्याचे वास्तव चित्र लक्षात घेता अशा परिस्थितीत उत्सव कोणालाच परवडणारा नाही. तरीही राज्य सरकारने गणेशोत्सवाला परवानगी दिली आहे. यासाठी मार्गसूचीही जाहीर करण्यात आली आहे. त्याचे प्रत्येकालाच पालन करावे लागणार आहे.
विघ्नहर्त्या गजाननाचे आगमन एक दिवसावर येऊन ठेपले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला केवळ घरगुती गणपतीलाच परवानगी मिळाली होती. सार्वजनिक गणेशोत्सवाला सरकारने परवानगी नाकारली होती. नियम, अटी घालून अखेर परवानगी देण्यात आली आहे. कर्नाटकात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढती आहे. रोज 5 ते 8 हजार नव्या रुग्णांची भर पडत आहे. बुधवारी एका दिवसात 8 हजारहून अधिक जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ही गोष्ट लक्षात घेता कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. आतापर्यंत साडेचार हजाराहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हा सरकारी आकडा आहे. प्रत्यक्षात मृतांचा आकडा कितीतरी पटीने अधिक आहे. कर्नाटकातील सध्याचे वास्तव चित्र लक्षात घेता अशा परिस्थितीत उत्सव कोणालाच परवडणारा नाही. तरीही राज्य सरकारने गणेशोत्सवाला परवानगी दिली आहे.
मंदिरात सार्वजनिक श्री मूर्तीची प्रति÷ापना करण्याची सूचना सरकारने केली होती. मूर्तीची उंची चार फुटांवर आणून ठेवली होती. घरगुती गणेशमूर्ती दोन फुटापेक्षा अधिक असू नये. जेणेकरून घरात किंवा घराजवळील एखाद्या टाकीत तिचे विसर्जन करता यावे, त्यासाठी हा नियम आहे. जेथे मंदिरे नसतील तेथे मंगल कार्यालयात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची सूचना करण्यात आली होती. आता लहान मंडप उभारण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी सरकारने परवानगी दिली आहे याचा अर्थ सर्व काही आलबेल आहे, उत्साहात उत्सव साजरा करा असा नाही. लॉकडाऊनच्या काळापासून आतापर्यंत कोणतेच सण उत्साहात झाले नाहीत. तरीही जनमताच्या रेटय़ामुळे सरकारने सार्वजनिक उत्सवाला दंडक घालून परवानगी दिली आहे. यासाठी मार्गसूची जाहीर करण्यात आली आहे. या मार्गसूचीचे प्रत्येकालाच पालन करावे लागणार आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यापक उपाययोजनांची गरज आहे. पूर्वी कोरोनामुळे दगावणाऱयांमध्ये 50 किंवा साठी ओलांडलेल्यांची संख्या अधिक असायची. आता 10 ते 30 वयोगटातील बाधितांचाही बळी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे उपचारांची व्यवस्था अपुरी पडू लागली आहे. सरकारी व खासगी इस्पितळे रुग्णांनी भरली आहेत. अशा परिस्थितीत गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. लक्षणे असणाऱया शंभर जणांची तपासणी केल्यानंतर 34 टक्क्मयांहून अधिक जणांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. तर लक्षणे नसणाऱया 100 जणांच्या तपासणीत किमान 12.8 टक्के जणांना बाधा झाल्याचे पाहणीत आढळून आले आहे. राज्य सरकारने तपासण्याही वाढवल्या आहेत. एकंदर परिस्थिती लक्षात घेता आता जनतेनेच काळजी घेण्याची गरज आहे. कारण सरकारने परवानगी दिली आहे म्हणून नियमांचे पालन न करता उत्सव साजरा करण्याचा प्रकार जीवघेणा ठरू शकतो, याची जाणीव ठेवूनच गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. अनेक गणेशोत्सव मंडळांनी परिस्थिती लक्षात घेऊन साधेपणाने उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे तर काही मंडळांनी रुग्णसेवा, गरजूंना मदत असे विधायक उपक्रम राबविण्याचेही ठरविले आहे.
24 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केले. त्यानंतर लॉकडाऊनची मुदत वाढतच गेली. तेव्हापासून बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. गणेशोत्सव म्हटले की बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल असते. फटाके, सजावट, फुले, फळे, रोषणाई, नवीन कपडे यांना चांगली मागणी असते. उत्सवाच्या काळात बाजारपेठ फुलून जाते. सध्या बाजारपेठेला मरगळ आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही मरगळ दूर होऊ लागली आहे. ही गोष्ट खरी असली तरी प्रत्येकाला काळजी घ्यावी लागणार आहे आणि ती वाढवावी लागणार आहे. कारण कोरोना महामारीचा फैलाव कमी झालेला नाही. त्याच्यावर लसही निघालेली नाही. अद्याप संशोधन सुरूच आहे. आहे त्या परिस्थितीत महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न करावे लागणार आहेत. अशा परिस्थितीत अत्यंत साधेपणाने व भक्तीभावाने गणेशोत्सव साजरा करण्याची गरज आहे. साधेपणा असला तरी भक्तीत तसूभरही कमतरता नसते. गेल्या चार-पाच महिन्यांपासून लोकांच्या मनात केवळ कोरोना व त्याची भीती भरलेली आहे. त्यामुळे साहजिकच नकारात्मकता वाढीस लागली आहे. प्रत्येक वर्गाला याचा फटका बसला आहे. त्यामुळे या धक्क्मयातून सावरण्यासाठी सकारात्मकतेकडे वाटचाल करण्याची गरज निर्माण झाली आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. आरतीसाठी कितीजण असावेत याचे नियम ठरविण्यात आले आहेत. गणपती आणतानाही मिरवणूक नसणार आहे. श्री विसर्जनाचीही मिरवणूक नसणार आहे. उत्सवात कोरोनाचा फैलाव अधिक होईल, अशी कोणतीच कृती कोणीही करू नये, अशा सक्त सूचना शासकीय यंत्रणेकडून देण्यात आल्या आहेत. या सूचना व नियमावली आपल्यासाठीच आहेत. उत्सवावर लादण्यात आलेले निर्बंध हे लोकहितासाठीच आहेत, याचे भान प्रत्येकाला बाळगावे लागणार आहे. कारण नियमावली जारी केल्यानंतर त्यावर टीकाही झाली आहे. आता सरकार गणेशोत्सवावरही बंदी आणणार का अशा थाटात टीका करण्यात येत आहे. कोरोना महामारी थोपवायची असेल तर नियमावलींचे पालन करावेच लागणार आहे. पोलीस, महसूल व इतर शासकीय यंत्रणांवर यंदा जबाबदारी आणखी वाढली आहे. पोलीस, डॉक्टर, महसूल, सफाई कर्मचारी, आरोग्यसेवक यांनाही कोरोनाची लागण होऊ लागली आहे. त्यांची सहनशीलता संपुष्टात आली आहे. त्यांचाही विचार आपण करायला हवा. कोरोनाने उत्सव साधेपणाने करता येतो का, हे पाहण्याचेच ठरविले असावे. कोरोना नक्की जाणार मात्र, डामडौल, दिखाऊपणा, दणदणाट या सर्वांना फाटा देत उत्सवाचे पावित्र्य जपण्याच्या संधीचे आपण सोने करायला हवे.