नागरिकांनी न घाबरता प्रतिबंधात्मक खबरदारी घ्यावी
प्रतिनिधी/ रत्नागिरी
चीनमध्ये थैमान घालत जगात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱया ‘करोना’ विषाणूबाबत रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभाग यंत्रणाही अलर्ट झाली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी केले आहे. त्यासाठी जिल्ह्य़ात आवश्यक उपाययोजनांसाठी ‘करोना कीट’ ची मागणी करण्यात आल्याचे सांगितले.
करोना विषाणू आजाराची सर्वसामान्य लक्षणे-सर्दी, खोकला (कॉमन कोल्ड) गंभीर स्वरूपाची श्वसन संस्थेची लक्षणे- श्वास घ्यायला त्रास होणे, श्वासास अडथळा, न्यूमोनिआ, पचनसंस्थेची लक्षणे- अतिसार, काही रुग्णांमध्ये मूत्रपिंड निकामी होणे, अशी आहेत. प्रतिकार शक्तीची कमतरता असलेल्या व्यक्तींमध्ये असामान्य लक्षणे आढळू शकतात. त्यामध्ये रोगप्रसार या विषाणूचा प्रसार नक्की कशा प्रकारे होतो, याची निश्चित माहिती आजच्या घडीला उपलब्ध नाही. मात्र लक्षणांचे स्वरूप पाहता, शिंकणे, खोकणे या वाटे हवेमार्फत विषाणूचा प्रसार होत असावा, असा एक अंदाज आहे. या विषाणूसाठी कोणतीही लस अथवा विशिष्ट औषध उपलब्ध नाही.
करोना विषाणू हा प्राणीजन्य आजार असला तरी हा नवीन विषाणू नक्की कोणत्या प्राण्याच्या संपर्कापासून पसरतो, याबद्दल सध्या निश्चित माहिती नाही. उपचार हा रुग्णाच्या लक्षणानुसार करावा. रुग्णाला सहाय्यभूत ठरणारी निगा अत्यंत प्रभावी ठरते. प्रतिबंधाची खबरदारी या विषाणूचा उद्भव कसा झाला आणि त्याचा प्रसार कसा होतो, हे निश्चितपणे माहितीसंदर्भात निश्चित प्रतिबंधात्मक खबरदारी कशी घ्यावी, यावर भाष्य करणे सर्वसाधारणपणे आजाराचे स्वरूप लक्षात घेता हा आजार होऊ नये, यासाठी खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे आवश्यक आहे.
रत्नागिरीतही जिल्हा आरोग्य यंत्रणाही या आजाराबाबत सतर्क झाली आहे. आजाराच्या पार्श्वभूमीवर येथील सर्व यंत्रणांना अलर्ट करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिली. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्व तालुक्यांना करोना किटची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर आरोग्य केंद्रांना 10, जिल्हय़ासाठी 20, तालुक्यांना 10 अशा प्रकारे करोना कीटची मागणी आरोग्य विभागस्तरावर करण्यात आली आहे. आरोग्य यंत्रणास्तरावर या आजाराच्या पार्श्वभूमीवर रिर्पोटींग सुरू करण्यात आले आहे. येथील किनारपट्टीभागात असलेलेल्या मोठय़ा बंदरांच्या ठिकाणी परदेशातून मोठय़ा मालवाहू जहाजांची ये-जा सुरू असते. त्या ठिकाणीही संबधित कंपन्या, बंदर विभागालाही आरोग्य यंत्रणेने खबरदारीचे पत्र देण्यात येणार असल्याचे डॉ. कमलापूरकर यांनी सांगितले.