कोरोना विषाणूमुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूचा संसर्ग जसा पसरू लागला तेव्हा लक्षात आले की ह्या विषाणूचा धोका तरूण वर्गापेक्षा ज्येष्ठ नागरिकांना अधिक आहे. त्यानंतर झालेल्या संशोधनामध्ये अधिक माहिती समोर आली हा विषाणू कर्करोग, हृदयाशी संबंधित आजार, मधुमेह आणि श्वसनविकार आदी आजारांच्या रूग्णांना सर्वसामान्य लोकांच्या तुलनेत जास्त धोका आहे. यामध्ये कर्करोगाच्या रुग्णांनी अतिविशेष दक्षता घेणे गरजेचे आहे. कारण असे रुग्ण कोरोनाच्या संसर्गात अडकल्यास त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता खूप अधिक असते. कारण या रुग्णांची प्रतिकारक्षमता कमजोर असते.
- कर्करोग कोणत्या टप्प्यावर आहे त्यावरून रूग्णाचा कोरोना संसर्गामुळे मृत्यु होऊ शकतो हे अवलंबून असते. कर्करोग कोणत्याही वयात होऊ शकतो, परंतू 70-80 टक्के कर्करोग असे आहेत ज्याचा धोका 40 वर्ष वयानंतर जाणवतो. अर्थात वय हा घटक इथे खूप महत्त्वाचा आहे. एखाद्या तरूण व्यक्तीला कर्करोग असेल आणि तो प्राथमिक टप्प्यावरचा असेल आणि त्याला कोरोनाचा संसर्ग झाला तरीही त्याला मृत्युचा धोका अधिक नाही. मात्र वयोवृद्ध व्यक्तीला चौथ्या टप्प्यावरचा कर्करोग आहे, तसेच मूत्रपिंड विकार असतील, श्वास घेण्यास अडचण येत असेल तर मृत्यूची शक्यता अधिक वाढते.
- कोरोना विषाणू थेट श्वसन संस्थेवर हल्ला करतात. श्वसननलिकेचा संसर्ग होऊन त्याला सूज येते आणि ती बंद होते. अशा परिस्थितीत जर कोणाला फुफ्फुसाचा कर्करोग आधीपासूनच असेल तर त्याला मृत्युचा धोका अधिक वाढतो. कारण फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे त्या रुग्णाला आधीच त्रास होत असतो. कोरोनामुळे ही परिस्थिती अधिक गंभीर होते. अशा परिस्थितीत बरेचदा व्हेंटिलेटरचाही फायदा होत नाही.
- फुफ्फुसांचे काम हवेतील ऑक्सिजन घेऊन तो रक्तात मिसळणे हे असते. तर ऑक्सिजन
- मिसळलेल्या रक्ताला शरीराच्या विविध अवयवांपर्यंत पोहोचवण्याचे काम हृदय करते. अशा वेळी जर फुफ्फुसे योग्य पद्धतीने काम करत नसतील तर हृदयाचे कामही योग्य प्रकारे होत नाही. हार्ट फेल्युअर होण्याचे हे एक मोठे कारण आहे.
- ब्लड कॅन्सर अर्थात रक्ताच्या कर्करोगात किमोथेरपी, औषधे आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट केल्याने प्रतिकारक्षमता कमजोर होते. ती पूर्ववत होण्यास कालावधी लागतो. रक्ताचा कर्करोगावर उपचार करताना अनेकदा बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्याची गरज भासते. इम्यून सेल बोन मॅरोमध्येच तयार होतात. त्यामुळे अशा रूग्णाची प्रतिकारक्षमता आधीच कमजोर झालेली असते. त्यांच्यामध्ये गरजेइतक्या इम्यून सेल तयार होत नाहीत.
- अशाच प्रकारे एखादा कर्करूग्ण किमोथेरेपी घेतो तेव्हा कर्करोगाच्या पेशींबरोबरच चांगल्या निरोगी पेशी देखील मरतात. परिणामी रूग्णाची प्रतिकार शक्ती कमी होते. ङया सर्व आरोग्यस्थितीत रूग्णाला कोरोनाचा संसर्ग झाला तर मृत्यूचा धोका खूप वाढतो. म्हणूनच कर्करोग असणार्या रुग्णांनी करोनापासून बचावासाठी अत्यंत सतर्क, सजग राहणे गरजेचे आहे.