प्रतिनिधी/रत्नागिरी
कोणत्याही पक्षाचे राज्य असले तरी शेतकऱयांच्या मूळ प्रश्नांना बगल दिली जाते. कृषीप्रधान असलेल्या भारत देशात शेतकऱयाला सन्मान हवा की नको? पण आजही विदर्भ, मराठवाडय़ात आत्महत्या होत आहेत. कोकणातील माणसांच्या साधेपणामुळेच येथे आत्महत्या होत नाहीत, ही खूप चांगली गोष्ट आहे. मात्र शेतकरी कुठलाही असला तरी त्याची अवस्था भिकाऱयापेक्षा बिकट झालीय, ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी येथील शेतकरी वाचला पाहिजे यासाठी जागृती करीत अहमदनगर येथील तरुण शेतकरी एका साध्या सायकलवरुन महाराष्ट्र पिंजून काढत आहे.
अहमदनगर जिह्यातील पाथर्डी आडगाव येथील बाळासाहेब बाबुराव कोळसे हा तरुण राज्यातील 36 जिह्यांपैकी 24 जिह्यात फिरुन सुमारे 3 हजार 150 किलोमीटरचे अंतर सायकलवरुन कापत गुरुवारी रत्नागिरीत दाखल झाला. केंद्र व राज्य सरकारमधील नेत्यांनी गटातटाचे राजकारण सोडून शेतकरी, विद्यार्थी व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळावा, याची मागणी त्याने केली आहे.
शेतकऱयांच्या पिकाला योग्य बाजारभाव मिळावा, शेतकऱयांना त्यांच्या मालाची किंमत ठरवता यावी, सरकारकडून मिळणारी मदत ही एकरी उत्पादन खर्च पकडून देण्यात यावी, उत्पादन खर्चाच्या एकरी हमीभाव द्यावा, शेतकऱयांना कर्जमुक्त करावे, शासनाच्या सर्व पदाची भरती एमपीएससीमार्फत करावी, शेतकऱयांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, तणावग्रस्त शेतकऱयांसाठी हेल्पलाईन काढावी व शेतीपंपासाठी मोफत वीज द्यावी, अशा मागण्या कोळसे यांनी केल्या आहेत.
या मागण्यांसाठी आतापर्यंत 24 जिह्यातील जिल्हाधिकाऱयांना भेटून त्याने शेतकऱयांचे प्रश्न त्यांच्यासमोर ठेवले आहेत. संपूर्ण राज्याचा दौरा झाल्यानंतर प्रत्येक जिह्यात देण्यात आलेल्या निवेदनासंदर्भात प्रशासनाने काय निर्णय घेतला, याची माहिती आपण पुन्हा घेणार असल्याचे त्याने सांगितले. सायकलवरुन नियमित 60 ते 70 किमीचा प्रवास बाळासाहेब कोळसे हा 32 वर्षीय युवा शेतकरी करतो आहे. रस्त्यात पेट्रोलपंपावर रात्री वस्ती करतो. रायगडमार्गे तो मुंबईत जाणार असून मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवणार असल्याची माहिती बाळासाहेब कोळसे यांनी दिली.
शेतकऱयांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न
आपणही एक कर्जबाजारी युवक आहोत. कर्जातून बाहेर पडण्यासाठी गेली 2-3 वर्ष प्रयत्न करीत आहे. परंतु त्याला यश येत नाही. कर्जबाजारी शेतकरी कोणत्या परिस्थितीत आत्महत्या करीत असतात, हे लक्षात येत आहे. त्यामुळे शेतकऱयांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत असून शासनाने शेतकऱयांसाठी ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणीही बाळासाहेब कोळसे यांनी केली आहे.