प्रतिनिधी/ वाई
शेतकऱयांच्या कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी नवी कमिटी नेमली आहे. जे नियमित कर्ज घेवून फेडतात त्यांच्या बाबतीत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हायकोर्टाची भूमिका घेवून त्यांना किती माफी द्यावयाची हे पहातील, अन्यथा आपण सुप्रीम कोर्ट आहोतच, असे आश्वासन देत नियमित कर्जफेड करणाऱया कर्जदार शेतकऱयांना माजी कृषीमंत्री खा. शरद पवार यांनी दिलासा दिला.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वाई येथील विभागीय कार्यालय आणि सोनगिरवाडी शाखा इमारतीच्या उद्घाटन खा. शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर होते. याप्रसंगी सहकार व पणनमंत्री आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे भोसले, आ.मकरंद पाटील, आ.दीपक चव्हाण, माजी जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, बँकेचे सर्व संचालक, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे यासह विविध मान्यवरांची व्यासपिठावर उपस्थिती होती.
खा. पवार पुढे म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँकेने वाईमध्ये उभारलेली विभागीय कार्यालय आणि सोनगिरवाडी शाखेची इमारत पाहून अत्यंत समाधान पावलो. वास्तू पाहून आपण मुंबईत आहोत का सिंगापूरमध्ये हा प्रश्न पडला. या इमारतीत सौंदर्य आहे, सर्वांना अभिमान वाटावा अशी ही शेतकऱयांची वास्तू आहे. या वास्तूला लक्ष्मणराव पाटील सहकार सदन असे नांव देण्यात यावे, असे उद्गार देशाचे माजी कृषि, अन्न व नागरी पुरवठा मंत्री खासदार शरदचंद्र पवार यांनी काढले.
1949 साली या बँकेची स्थापना झाली आणि आज ती संपूर्ण हिंदुस्थानात सहकारी बँकांमध्ये 1 नंबरची अव्वल बँक आहे. याचे कारण बँक व्यवस्थापनाचा स्वच्छ कारभार आणि स्वच्छ व्यवहार असून 14 लाखावर सुरु झालेली ही बँक 12000 कोटींची आहे. या बँकेला 80 पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत. बँकेची वसूली 95 टक्के आहे आणि एनपीए शून्य आहे ही अत्यंत गौरवाची बाब आहे.
पवार साहेब पुढे म्हणाले, आपण कर्ज म्हणून घेतलेले पैसे परत केले पाहिजेत. कोकणांत 100 टक्के कर्जफेडीची विचारधारा आहे. घेतलेला पैसा परत दिला पाहिजे हा विचार या बँकेच्या शेतकऱयांनी केला म्हणून 95 टक्के वसुली झाली आहे. ही शिस्त स्व. आबासाहेब वीर यांनी सुरु केली आणि तीच शिस्त पुढे लक्ष्मण तात्यांनीही अमलात आणली लक्ष्मणराव पाटीलांसारखा सहकारी मी पाहिला नाही तोच विचार मकरंद आबा, नितिन पाटील चालवीत आहेत. बँकेच्या संचालक मंडळात वेगवेगळ्या विचाराचे संचालक असतील परंतु सभासदांच्या हितासाठी राजकीय जोडे बाहेर ठेवून त्यांच्या हिताचे निर्णय घेणारी ही बँक आहे आणि तिचा आदर्श इतरांनी घेतला पाहिजे. माझ्या केंद्रीय मंत्रीपदाच्या कालावधीत मी 70 हजार कोटी कर्ज माफ केले तरी सुध्दा पीक उत्पादनांत देश स्वयंपूर्ण केला आणि जगाचा भारताकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, बँकेची वसूली 95 ते 99 टक्के असून बँकेने नाबार्डची इतकी पारितोषिके घेतली आहेत की शेवटी त्यांना नियम बदलण्याची वेळ आली आह. कारण सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकच हे नॉर्म पूर्ण करीत होती व आहे. स्व. आबासाहेब वीर यांनी घातलेली शिस्त शेतकरी पाळत आहेत. त्यामुळे बँक अग्रस्थानी आहे.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील सत्काराला उत्तर देताना म्हणाले, वाई तालुक्यांत महत्वाचे विभागीय कार्यालय झाले आहे. ही बँक देशात आदर्श बँक असून स्व. लक्ष्मणराव पाटील यांच्यामुळे ही विभागीय कार्यालयाची वास्तू उभी राहिली आहे. भविष्यांत ही वास्तू शेतकऱयांच्या जीवनांत आर्थिक परिवर्तन घडविणारी वास्तू ठरणार आहे.
आमदार मकरंद पाटील म्हणाले पूर्वीच्या खरेदी विक्री संघाची गोडावूनची जागा बँकेने खरेदी केली वाईतालुका सह.खरेदी विक्री संघ अडचणीत होता तो आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्याची कल्पना स्व. लक्ष्मणराव पाटील यांनी मूर्त स्वरुप देवून दोन्ही संस्थांचा फायदा करुन दिला.
कर्जमाफी थकबाकीदारांना झाली पण जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांना 1 लाखापर्यंत कर्जमाफी व्हावी अशी आग्रही मागणी करुन आ.मकरंद पाटील म्हणाले हे सरकार निव्वळ पवारसाहेबांमुळे आहे विकासाची कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाणार आहेत.
बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेवून या उदघाटनप्रसंगी तात्यांची प्रकर्षाने आठवण येते. असे सांगून बँकेच्या आर्थिक उलाढालीला उहापोह केला. नियमित कर्ज भरणारांना सवलत मिळावी ही मागणीही त्यांनी यावेळी केली.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे यांनी बँकेच्या कारभाराची व व्यवस्थापनाची माहिती उपस्थितांना †िदली.
यावेळी विभागीय कार्यालयाचे उद्घाटन झाल्याचे पवारसाहेब यांनी जाहिर केले. त्यांचा सत्कार बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रबाबांनी केला. सर्व मान्यवरांचा सत्कार बँकेच्या वतीने करण्यांत आला.
वाई नगरपरिषद वाई शेती उत्पन्न बाजार समिती व पंचायत समिती वाई यांचेवतीने शरदचंद्रजी पवार व सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यांत आला.
कार्यक्रमाकरिता वाई जावली फलटण खंडाळा सातरा महाबळेश्वर येथील शेतकऱयांनी मोठी गर्दी केली होती. तसेच राष्ट्रवादी काँगेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन विठ्ठल माने यांनी केले आभार माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी मानले.