बेरोजगार मृतांमध्ये कर्नाटक तर कर्जदारांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक प्रकरणे : संसदेत आकडेवारी जाहीर
मागील 3 वर्षात…
- देशात 17 हजार 199 शेतकऱयांनी संपवली जीवनयात्रा
- बेरोजगारीमुळे 9 हजारहून अधिक लोकांच्या आत्महत्या
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या तीन वर्षांत आर्थिक अडचणींमुळे बेरोजगार झालेल्या आणि आत्महत्या करणाऱयांची संख्या सरकारने संसदेत उघड केल्यानंतर हजारोंना आर्थिक समस्यांमुळे जीव गमवावा लागल्याचे स्पष्ट झाले आहे. 2020 मध्ये बेरोजगारीमुळे 3,548 लोकांनी आत्महत्या केल्याचे गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले. तसेच 2018 ते 2020 दरम्यान, दिवाळखोरी किंवा कर्जबाजारीपणामुळे 16,000 हून अधिक लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. याच कालावधीत बेरोजगारीमुळे 9,140 जणांनी मृत्यूला कवटाळल्याचेही आकडेवारीतून दिसून येते. तर याच तीन वर्षात देशभरात तब्बल 17 हजार 199 शेतकऱयांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही सगळी आकडेवारी नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्युरोच्या हवाल्याने देण्यात आली आहे.
कोरोना संसर्गाच्या गंभीर स्थितीनंतर भारतात बेरोजगारीचे संकट गंभीर होत आहे. 2020 मध्ये 3,548 जणांनी तर 2019 मध्ये 2,851 जणांनी बेरोजगारीमुळे आत्महत्या केल्या. 2020 मध्ये कर्नाटकात (720) सर्वाधिक बेरोजगारांनी आत्महत्या केल्या. त्यानंतर महाराष्ट्र (625), तामिळनाडू (336), आसाम (234) आणि उत्तर प्रदेश (227) असे आत्महत्यांचे प्रमाण आहे. तसेच 2020 मध्ये, दिवाळखोरी किंवा कर्ज थकबाकीमुळे झालेल्या आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. 2020 मध्ये महाराष्ट्रात 1,341 आत्महत्या झाल्या. त्यापाठोपाठ कर्नाटक (1,025), तेलंगणा (947), आंध्रप्रदेश (782) आणि तामिळनाडू (524) यांचा क्रमांक लागतो.
2018, 2019 आणि 2020 मध्ये बेरोजगारीमुळे एकूण 9 हजार 140 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. एवढेच नाही तर कर्जबाजारीपणामुळे तीन वर्षांत एकूण 16 हजार 91 जणांनी आत्महत्या केल्याचेही सांगण्यात आले. सरकारने दिलेल्या या आकडेवारीमध्ये मार्च 2020 मध्ये कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर उद्भवलेल्या परिस्थितीची केवळ सुरुवातीची आकडेवारीच समाविष्ट करण्यात आली आहे. भारतात कोरोना महामारीनंतर रोजगाराच्या क्षेत्रात नोकरी शोधणाऱयांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. कोरोनामुळे अनेक उद्योग-व्यवसाय बंद पडले आहे. साहजिकच याचा फटका नोकरदारांना बसला. डिसेंबरमध्ये 52 दशलक्षाहून अधिक लोक नोकरीच्या शोधात होते.