प्रतिनिधी/ सातारा
कर्तव्य सोशल ग्रुप व सागर मित्र अभियान या सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या सातारा शहर प्लास्टिकमुक्ती उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभत आहे. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी गोळा केलेला प्लास्टिक कचरा दर महिन्याच्या 2 तारखेला उचलून त्याचे विघटन करण्यात येत आहे. या उपक्रमात तब्बल एक टेम्पो भरुन प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला असून त्याचे विघटन करण्यात आले.
शहर परिसरातील शाळांना प्लास्टिक मुक्तीसाठी आवाहन करण्यात आले होते. कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीला शहर आणि परिसरातील अनेक शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानुसार दि. 2 जानेवारी रोजी सहा शाळेतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेत दूध पिशवी, तेल पिशवी, पाण्याची बाटली, प्लास्टिक पाऊच, किराणा मालासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक, चॉकलेट रॅपर, तुटक्या वॉटर बॅग, चप्पल, डबे, कंपास, फोल्डर, फूटपट्टी यासह प्लास्टिकपासून बनवलेल्या तुटक्या, निरुपयोगी वस्तू असा सर्व प्रकारचा कचरा सौ. सुशिलादेवी साळुंखे हायस्कूल, अजिंक्यतारा माध्यमिक विद्यालय शेंद्रे, हत्तिखाना शाळा, ब्लॉसम स्कूल, छ. शाहू अकॅडमी आणि नवीन मराठी शाळा या शाळांमधील विधार्थ्यांनी गोळा केला होता.
विद्यार्थीदशेतच मुलांना स्वच्छता आणि कचरा निर्मुलनाची आवड निर्माण व्हावी. त्यांच्या कृतीतून पालकांना बोध व्हावा आणि आपला सातारा स्वच्छ, सुंदर आणि निरोगी व्हावा, यासाठी हा अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी गोळा करुन ठेवलेला प्लास्टीक कचरा दर महिन्याच्या 2 तारखेला कर्तव्य सोशल ग्रुपचे कार्यकर्ते वाहनातून स्वखर्चाने उचलून घेवून जात आहेत. तसेच उचललेल्या या कचऱयाचे विघटनही सागर मित्र सेवाभावी संस्थेमार्फत केले जात आहे. त्यामुळे खऱया अर्थाने प्लास्टीक कचऱयाचे निर्मुलन होत आहे.