पंतप्रधान मोदी यांचा तरुणाईला संदेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आपण अनेकदा आपल्या अधिकारांची चर्चा करून आपल्या सजग नागरिकत्वाचा परिचय देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तथापि, आता केवळ अधिकारांची नव्हे तर कर्तव्यासंबंधीही तितकीच सजगता दाखविण्याची वेळ आली आहे. देशाप्रती आपले कर्तव्य यथास्थित पार पाडले तरच नवा भारत घडविता येईल. त्यामुळे देशातील तरुणाईने आता तिच्या राष्ट्रीय कर्तव्यांवर भर द्यावा, असा महत्त्वपूर्ण संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.
प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणाऱया भव्य कार्यक्रमात सहभागी होणार असलेल्या युवकांसमोर ते शुक्रवारी बोलत होते. भौगोलिक आणि सामाजिक विविधता हे भारताचे वैशिष्टय़ असून त्यात देशाचे थोरपण सामावलेले आहे. कोणतीही व्यक्ती, कोणताही समाज आणि कोणताही धर्म या देशात मागे पडता कामा नये, हे पाहण्याचे उत्तरदायित्व आपल्या सर्वांचे आहे. यासाठीच आपण सर्वांनी कर्तव्यदक्ष राहणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
प्रजासत्ताक दिन संचलनाचे महत्त्व
प्रजासत्ताक दिनी देशभरातील सर्व समाज घटकांमधील लोक संचलनात सहभागी होतात. हे संचलन केवळ शिस्तीचा भाग म्हणून करण्यात येत नाही. तर त्यातून देशाच्या सैनिकी सामर्थ्याचे आणि एकात्मतेचे भव्य दर्शन साऱया जगाला होते. भारत हे विविध संकल्पना, अनेक विचारधारा आणि बहुविध मूल्यांचे मिश्रण आहे. अनेकतेत एकता हे भारताचे वैशिष्टय़ या संचलनात स्पष्ट होते. यादृष्टीने या संचलनाकडे पाहिले पाहिजे, अशीही सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.