वृत्तसंस्था / चंदीगड
पंजाबमध्ये निवडणुकीच्या राजकीय वातावरणादरम्यान केंद्र सरकारने गुरुनानक देव यांच्या प्रकाशपर्वाच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच बुधवारपासून कर्तारपूर कॉरिडॉर खुला करण्याची घोषणा मंगळवारी केली आहे. त्याच दिवशी कर्तारपूरला जाण्यासाठी नोंदणी सुरू होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी ट्विट करत याची माहिती दिली आहे. गुरुनानक देव यांचा प्रकाशपर्व 19 नोव्हेंबर रोजी आहे. पहिल्या तुकडीत 250 भाविक पाकिस्तानात पोहोचणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कर्तारपूर साहिब कॉरिडॉर पुन्हा खुला करण्याच्या निर्णयामुळे देशभरात आनंद आणि उत्साहाला अधिकच उधाण येणार असल्याचे शाह यांनी ट्विट करत म्हटले आहे.
नियमांचे पालन आवश्यक
सुमारे 20 महिन्यांनी कर्तारपूर कॉरिडॉल खुला होणार असला तरीही याकरता कोरोना विषयक दिशानिर्देशांचे पालन करावे लागेल. कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेण्यासह 72 तासांपेक्षा कमी वेळेतील आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल दाखवावा लागणार आहे. कर्तारपूर साहिबच्या व्हिसामुक्त प्रवासासाठी भारताचा कुठलाही 13-75 वयोगटातील नागरिक किंवा अनिवासी भारतीय प्रवासावर जाऊ शकतो. याकरता ऑनलाईन अर्ज भरावा लागेल आणि 20 डॉलर्स म्हणजेच आता 1400 रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे.
शिखांसाठी महत्त्वाचे तीर्थस्थळ
कर्तारपूर साहिब हे शिखांचे पवित्र तीर्थस्थळ आहे. शिखांचे पहिले गुरु गुरुनानक देव यांचे येथे वास्तव्य होते. त्यांनी सुमारे 17-18 वर्षे येथे वास्तव्य केले होते. कर्तारपूर साहिब पाकिस्तानच्या नारोवाल जिल्हय़ात असून ते भारतीय सीमेपासून 3-4 किलोमीटर अंतरावर आहे. फाळणीवेळी हे स्थान पाकिस्तानात समाविष्ट झाले होते. तेव्हापासून शीख भाविक डेरा बाबा नानक येथे बसविण्यात आलेल्या दुर्बिणीतून या पवित्रस्थळाचे दर्शन घेत होते.
कर्तारपूर कॉरिडॉर
कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन 9 नोव्हेंबर 2019 रोजी झाले होते. भारतात पंजाबच्या डेरा बाब नानक येथून आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत कॉरिडॉरची निर्मिती करण्यात आली आहे. तर पाकिस्तानच्या सीमेपासून नारोवाल जिल्हय़ातील गुरुद्वारापर्यंत कॉरिडॉरची निर्मिती झाली आहे.
महामारीमुळे कॉरिडॉर होते बंद
मार्च 2020 पासून कर्तारपूर कॉरिडॉर बंद आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानला कॅटेगरी-सीमध्ये ठेवून सरकारने कर्तारपूर कॉरिडॉर खुला करण्याचे संकेत दिले होते. तर कोरोनाचे संक्रमण ओसरल्यावर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांनी यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते. तर मागील 3 दिवसांपासून पंजाब भाजपच्या एका शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची याप्रकरणी भेट घेतली होती.