बेंगळूर/प्रतिनिधी
शेती क्षेत्राच्या कायद्यातील सुधारणांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्य कॉंग्रेस पक्ष २० जानेवारी रोजी बेंगळूर येथे राजभवनावर धडकणार आहेत. काँग्रेसने २० जानेवारीला ‘राजभवन चलो’ ची हाक दिली आहे.
कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी ‘फ्रीडम पार्क ते राजभवनापर्यंत एक विशाल निषेध रॅली काढली जाईल, ज्यात राज्यभरातील कॉंग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी होतील, असे म्हंटले आहे.
सोमवारी हुबळी येथे केपीसीसीतर्फे आयोजित ‘बेळगाव’ विभागीय ‘संकल्प संवाद’ चे उद्घाटन झाल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली. २०२१ हे राज्यात कॉंग्रेसच्या संघटनेचे आणि संघर्षाचे वर्ष म्हणून घोषित केले गेले, असे त्यांनी नमूद केले.
आगामी जिल्हा पंचायत, तालुका पंचायत आणि महानगरपालिका निवडणुकीत कॉंग्रेसच्या तिकिटांवर निवडणूक लढवू इच्छुणाऱ्यांनी थेट अर्ज भरण्याऐवजी अर्ज मागविण्यात येणार आहेत. पक्षाला तिकीट देताना संघटनात्मक कौशल्ये, अनुभव आणि इच्छुकांच्या इतर क्षमतांचा विचार केला जाईल, आणि त्यांनंतरच त्यालापक्षाकडून उमेदवारी देण्याचा विचार केला जाईल असेही ते म्हणाले.