काठमांडू / वृत्तसंस्था
नेपाळच्या तारा एअरचे 9-एनएईटी दुहेरी इंजिन असलेले विमान रविवारी सकाळी टेक ऑफ केल्यानंतर काही वेळातच बेपत्ता झाले. सदर विमान दुर्घटनाग्रस्त झाले असून त्यातील 22 जणांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार जवळपास स्पष्ट झाले आहे. दुर्घटनाग्रस्त विमानात 3 क्रू मेंबर्ससह 22 जण होते. त्यापैकी 4 भारतीय असून ते महाराष्ट्रातील ठाणे येथील असल्याचे सांगण्यात आले. अशोक कुमार त्रिपाठी, पत्नी वैभवी बांदेकर-त्रिपाठी आणि मुले धनुष व रुतिका अशी विमानातील मृत भारतीयांची नावे आहेत. दुर्घटनाग्रस्त विमान 30 वर्षे जुने असून खराब हवामानामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
नेपाळ विमानतळ प्राधिकरणाकडून विमान दुर्घटनेसंबंधी सविस्तर माहिती जारी केली आहे. रविवारी सकाळी 9.55 वाजता विमानाने पोखराहून जोमसोमला उड्डाण केले होते. 10.20 वाजता ते उतरणार होते, मात्र 11 वाजेपर्यंत त्याच्याशी संपर्क न झाल्यामुळे विमान भरकटल्याचा दावा करण्यात आला. दुपारच्या सुमारास विमान बेपत्ता झाल्याची माहिती नेपाळ विमानतळ प्राधिकरणाकडून जारी करण्यात आली. विमान बेपत्ता झाल्यानंतर लष्कर आणि हवाई दलाच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात आली. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास विमानाचे अवशेष मुस्तांग येथील लमची नदीच्या काठावर कोसळल्याचे स्पष्ट झाले. लमची ही मुस्तांग जिह्यातील मानपती हिमालयीन प्रदेशातील एक मोठी नदी आहे.
लष्कर-हवाई दलाकडून शोधमोहीम
मुस्तांग येथे विमानाचे शेवटचे सिग्नल मिळाले होते. अंतिम क्षणापर्यंत विमानातील एका कॅप्टनचा मोबाईल फोन चालू होता. त्यानुसार त्याचे लोकेशन टेस केले असता विमानाचे लोकेशनही सापडले. मात्र, याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. शोध मोहिमेत गुंतलेले नेपाळ आर्मीचे हेलिकॉप्टर मुस्तांग भागात पोहोचले होते. तथापि, खराब हवामानामुळे शोध आणि बचावकार्य थांबवावे लागले. सध्या या परिसरात बर्फवृष्टी आणि पाऊस पडत आहे. लष्कराबरोबरच हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टर्सद्वारे शोधमोहीम राबविण्यात आली.
3 क्रू मेंबर्ससह एकूण 22 प्रवासी
तारा एअरचे प्रवक्ते सुदर्शन बारतौला यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात 3 क्रू मेंबर्स होते. तसेच प्रवाशांमध्ये 13 नेपाळी, 4 भारतीय आणि 2 जर्मन नागरिकांचा समावेश आहे. यापूर्वी 2016 मध्ये तारा एअरचे विमान नेपाळमधील पोखराहून जोमसोमला जात असताना त्याचा संपर्क तुटला होता. टेकऑफनंतर काही वेळातच ते क्रॅश झाले आणि त्यात विमानातील सर्व 23 जणांचा मृत्यू झाला होता. रविवारी झालेल्या या नव्या अपघातानंतर 2016 मधील अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
आठ ‘ठाणेकरां’वर काळाचा घाला
नेपाळमधील विमान दुर्घटनेत चार भारतीयांना प्राण गमवावे लागले आहेत. सदर त्रिपाठी कुटुंबीय हे मूळचे महाराष्ट्रातील ठाणे जिल्हय़ातील कापूरबावाडी येथील रहिवासी आहेत. तसेच दुसऱया घटनेत, उत्तर सिक्कीममधील केदुंग भीर येथे शनिवारी रात्री 8 च्या सुमारास झालेल्या एका कार अपघातात ठाण्यातील अन्य चौघांचा मृत्यू झाला आहे. कार खोल दरीत कोसळल्याने ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात ठार झालेल्यांमध्ये सुरेश पुनामिया, तोरल पुनामिया, देवांशी पुनमिया आणि हिरल पुनामिया हे एकाच कुटुंबातील असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.