कुडाळमधील जागरुक नागरिक, पत्रकारांची सतर्कता : सतरा कामगार कुटुंबियांसह चालत निघाले होते : तहसीलदार, पोलिसांनी पाठविले माघारी
वार्ताहर / कुडाळ:
मुले व आई-वडिलांच्या काळजीने शुक्रवारी रात्री आपल्या कर्नाटक राज्यात चालत निघालेल्या सतरा कामगारांसह त्यांच्या कुटुंबांना येथील जागरुक नागरिक व पत्रकारांनी रोखले. नंतर तहसीलदार व पोलीस अधिकाऱयांनी तेथे जात, ‘तुमची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू. येथून जाऊ नका’, असे सांगून त्यांना माघारी पाठविले.
शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कर्नाटक राज्यातील यादगिरी गावातील येथे मोलमजुरीसाठी असलेले सतरा कामगार चालत गावी जाण्यासाठी निघाले. लॉकडाऊनच्या कालावधीत बाहेर जाण्यास बंदी असताना ते येथील इंद्रप्रस्थनगरमार्गे एमआयडीसी-ओंकारनगर येथून आडवाटेने जात होते. जागरुक नागरिकांनी त्यांना तेथे रोखले. तसेच पत्रकारांनीही तेथे धाव घेत त्यांना येथून जाऊ नका, असा सल्ला दिला.
मुले व आई-वडिलांची काळजी
‘त्या’ कामगारांची मुले शिकत असून ती वसतिगृहात होती. ती लॉकडाऊनमुळे गावी आली आहेत. तसेच वृद्ध आई-वडील गावी आहेत. मुले व आई-वडिलांच्या काळजीने ते जात असल्याचे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले. दरम्यान, ही माहिती मिळताच तहसीलदार रवींद्र नाचणकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे तेथे दाखल झाले. लॉकडाऊन काळात असे जाणे योग्य नाही. तुमच्या गावाकडील माणसांची गैरसोय होत असेल, तर आपण कर्नाटक सरकारशी चर्चा करतो, असे नाचणकर यांनी सांगून प्रशासनामार्फत तुम्हाला आवश्यक सोयी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही दिली. तसेच त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
आम्ही तुमची काळजी घेऊ!
आम्ही तुमची काळजी घेऊ. तुमच्या गावाकडील कुटुंबांची माहिती आम्हाला द्या. तुम्हाला येथे जेवणाची वगैरे अडचण येणार नाही, अशी ग्वाही हुलावळे यांनी दिली. त्यानंतर ते कामगार आपल्या कुटुंबियांसह येथील राहत्या ठिकाणी परतले.