लुपीन फाऊंडेशनतर्फे फूड पॅकेटस्चे वाटप
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
लॉकडाऊनमुळे गेले दोन महिने जिह्यात अडकलेल्या मजूर, कामगार यांना त्यांच्या गावी जाता यावे, यासाठी राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने केलेल्या
प्रयत्नांमुळे शनिवारी सायंकाळी दुसरी श्रमिक विशेष रेल्वे कर्नाटकातील यादगिरकडे रवाना झाली. जिह्यातून एकूण एक हजार 535 मजूर व कामगार या रेल्वेने त्यांच्या स्वगृही रवाना झाले. यावेळी मजुरांच्या चेहऱयावर समाधान व गावी जाण्याचा आनंद दिसून येत होता.
यावेळी प्रवाशांना लुपीन फाऊंडेशनच्या माध्यमातून पाण्याची बाटली, मास्क, साबण व फुड पॅकेटस्चे वाटप करण्यात आले. जिह्यातील सात तालुक्यातील एक हजार 535 कामगार व मजुरांना दुपारपर्यंत एस. टी. बसने सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकामध्ये आणण्यात आले. यामध्ये कुडाळ तालुक्यातील 198 व्यक्ती 10 बसगाडय़ांमधून, देवगड तालुक्यातील 450 व्यक्ती 22 गाडय़ांमधून, मालवण तालुक्यातील 211 व्यक्ती 10 गाडय़ांमधून, कणकवली तालुक्यातील 120 व्यक्ती 6 गाडय़ामधून, सावंतवाडी तालुक्यातील 211 व्यक्ती 10 गाडीमधून, वैभववाडी तालुक्यातील 54 व्यक्ती 3 गाडय़ामधून, तर वेंगुर्ला तालुक्यातील 291 व्यक्ती 15 गाडय़ा अशा एकूण 76 एस.टी. बसमधून सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकात आणण्यात आले. या वाहतुकीवेळी सामाजिक अंतराचे योग्य ते पालन करण्यात आले. तसेच सामाजिक अंतराचे पालन करत या सर्वांना त्यांची तिकीटे देत रेल्वेमध्ये आसनस्थ करण्यात आले.
जिल्हा पोलीस दलाची विशेष कामगिरी
गावाकडे जाण्याची आस, त्यासाठी सुरू असलेली लगभग आणि रेल्वेत बसण्याची घाई यामध्ये गोंधळून गेलेली महिला मजूर रेल्वेत सामान ठेवण्यासाठी पुढे गेली आणि एस.टी. मध्ये असलेली उर्वरित सामान आणण्यासाठी बाहेर आली. एस.टी. न दिसल्यामुळे घाबरुन गेली. चेहऱयावर आसवे ओरघळू लागले. यावेळी कर्त्यव्यावर असलेले सहायक पोलीस निरीक्षक ओटवणेकर व केराम यांनी या महिलेला धीर देऊन संबंधित एस.टी बस ओरोस फाटा येथे तातडीने बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे संपर्क साधून थांबविली. यावेळी पोलीस दलाची खास गाडी पाठवून संबंधित महिलेचे सामान परत तिला मिळवून दिले. या प्रसंगी भारवलेली महिला आनंदाश्रूने नाहून निघाली. या महिलेच्या चेहऱयावरील आनंद पाहून पोलीस दलही सुखावला.
यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, कुडाळच्या प्रांताधिकारी वंदना खरमाळे, कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने, सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी प्रशांत ढगे, सावंतवाडी पोलीस उपअधीक्षक शिवाजी मुळीक, स्टेशन मास्तर वैभव दामले आदी उपस्थित होते.
रेल्वेमध्ये प्रवासी बसत असताना कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एकूणच पुरुष महिला, लहान मुले, वृद्ध आणि अपंग यांची घरी जाण्यासाठीची मोठी लगबग या ठिकाणी पहावयास मिळाली.
शेवटी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी जिल्हा व पोलीस प्रशासन यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कर्त्यव्यावर असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मनोबल वाढवून आभार मानले.