प्रतिनिधी / कोल्हापूर
बेळगावमध्ये एकाच वेळी 17 कोरोना पॉझीटीव्ह आढळल्याने सिमावर्ती तालुक्यातील गावांमाध्ये अतिदक्षता घेतली जात आहे. याचा कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीतवरही विपरित परिणाम झाला आहे. बेळगावसह सिमा भागातून येणार भाजीपाला, फळांची आवक पूर्णंतः बंद केल्याने बाजार समितीची दैनंदिन उलाढाल 40 टक्क्यांवर आली आहे. बाजार समितीचा दररोज 25 ते 30 हजार सेस बुडत आहे.
कोरोनाच्या महमारीत पश्चिम महाराष्ट्रातील सांगली वगळता परिस्थिती नियंत्रणात आहे. कोल्हापुरात कोरोनाच्या संसर्गाने एकही रुग्ण दगावलेला नाही. प्रशासनाने वेळोवेळी घेतलेल्या खबरदारीमुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. तथापि बेळगावात गुरुवारी 17 आणि शुक्रवारी आणखी 5 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे सिमाभाग हादरला आहे. बेळगाव लगत असलेल्या महाराष्ट्रातील सिमाभागातील शिरोळ, हातकणंगले, कागल, चंदगड तालुक्यांना दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या चारही तालुक्यातील किमान 20 ते 25 गावांचा सिमाभागात नियमित संपर्क असतो. दररोजची उठबस सुरु असते. महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकाशी त्यांचे दैनंदिन व्यवहार असतात. येथील काही शेतकऱयांची शेतजमीन सिमाभागातील गावांमध्ये आहे. त्यामुळे त्या शेतकरी कुटुंबांचा नियमित ये-जा असल्याने प्रशासन दक्ष झाले आहे.
याचा बाजार समितीच्या दैनंदिन उलाढालीवरही विपरित परिणाम झाला आहे. कोल्हापूर बाजार समितीत पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातील घटप्रभा, गोकाक, बेळगाव येथून भाजीपाला, फळांची मोठी आवक होते. हा भाजीपाला येथून गोवा, सिंधुदूर्ग, रत्नागिरीकडे पाठवला जातो. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने येथील व्यापाऱयांनी कर्नाटकातील भाजीपाला गरजेपुर्ताच मागवणे पसंत केले. मात्र दोन दिवसापूर्वी बेळगावमध्येच एकाच वेळी 17 रुग्ण पॉझिटीव्ह आढळल्याने संपूर्ण आवक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शनिवारी भाजीपाला, फळांची टंचाई भासू शकते. तथापि सोलापूर, सांगोला, मंगळवेढा येथील स्थानिक बाजार बंद असल्याने येथील भाजीपाला कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत दाखल होत आहे.
भाजीपाल्याचे सौदे शनिवारी पूर्ववत सुरु होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी बाजार समितीची तपासणी केली. सोशल डिस्टंन्ससह आदींबाबत सूचना केल्या. एकाच वेळी विक्रीदार आणि खरेदीदार यांची गर्दी होवू नये याबाबत योग्य नियोजन करावे, भाजीपाला वाहतुकीच्या वाहनांची ये-जा वेगवेगळय़ा ठिकाणाहून करण्यात यावी, याबाबत मार्गदर्शन केले. सचिव मोहन सालपे यांनी केलेल्या नियोजनाची माहिती दिली. यावेळी स्थनिक गुन्हा अन्वेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक तानाजी सावंत, पोलीस उपाधिक्षक प्रेरणा कट्टे, वाहतुक शाखेचे वसंत बाबर, शाहुपुरीचे श्रीकृष्ण कटकधोंड आदी उपस्थित होते.