पुढचे 1-2 महिने काटेकोरपणे नियमांचे पालन करून खबरदारी घेतली तर कर्नाटकात कोरोना महामारीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविणे शक्मय होणार आहे, असे तज्ञ समितीचे डॉ. सी. एन. मंजुनाथ यांनी सांगितले आहे. पुढील 2 महिने अत्यंत महत्त्वाचे आहेत.
कर्नाटकात कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला रोज दहा हजार नवे रुग्ण आढळून येत होते. आता ही संख्या निम्याहून अधिक कमी झाली आहे. पुढचे एक-दोन महिने काटेकोरपणे नियमांचे पालन करून खबरदारी बाळगली तर कोरोना महामारीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविणे शक्मय होणार आहे, असे तज्ञ समितीचे डॉ. सी. एन. मंजुनाथ यांनी सांगितले आहे. पुढील दोन महिने अत्यंत महत्त्वाचे आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे राज्यातील 11 हजाराहून अधिक जण दगावले आहेत. कर्नाटकात यंदाचा दसरा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोना बळींच्या संख्येत देशात महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटकाचा दुसरा क्रमांक लागतो. गेल्या 15 दिवसापासून बाधित व बळींची संख्या घटली असली तरी हिवाळय़ात प्रत्येकांनी काळजी घेतली तरच महामारीचा फैलाव रोखता येणार आहे. कारण कोरोनाचा फैलाव कमी झाला आहे. पूर्णपणे अद्याप त्याचा नायनाट झालेला नाही. म्हणून खबरदारीच प्रभावी ठरणार आहे.
येत्या जानेवारीत कोरोनावर लस उपलब्ध होणार आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. सुधाकर यांनी ही माहिती दिली आहे. आस्ट्राजनिक कंपनीच्या पदाधिकाऱयांशी चर्चा केल्यानंतर आरोग्य मंत्र्यांनी दोन ते तीन महिन्यात लस उपलब्ध होण्याची आशा व्यक्त केली आहे. पहिल्या टप्प्यातील प्रयोग यशस्वी झाला आहे. दुसऱया आणि तिसऱया टप्प्यातील प्रयोग सुरू आहे. त्यानंतर लस उपलब्ध होणार आहे. लस वाटप कशी करायची याचीही रूपरेषा कर्नाटकाने तयारी केली आहे. पहिल्या टप्प्यात डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कार्यकर्ते आदी कोरोना वॉरियर्सना लस उपलब्ध होईल याची काळजी घेतली जाणार आहे. त्यानंतर वृद्ध, गर्भवती महिला, प्रसूती झालेल्या महिला यांना लस उपलब्ध होणार आहे. तोपर्यंत हिवाळय़ात मोठी खबरदारी घ्यावी लागणार आहे. मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर याचा वापर करूनच सध्या कोरोना नियंत्रणात ठेवता येणार आहे. राजधानी बेंगळूर येथे सक्रिय प्रकरणांची संख्या अधिक आहे. ऑक्स्फर्ड विद्यापीठाच्या सहयोगातून आस्ट्राजनिक संस्थेचे प्रयोग सुरू आहेत.
बी. श्रीरामलु यांच्याकडील आरोग्य मंत्रीपद आता वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. सुधाकर यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य ही दोन्ही प्रमुख खाती एकाचकडे असली तर कोरोना महामारी थोपविण्याच्या प्रयत्नात यश मिळविता येणार आहे. कारण दोन खात्यातील समन्वयाचा अभाव, निर्णय प्रक्रियेला होणारा विलंब आदी कारणांमुळे ऐन संक्रमणाच्या काळात आरोग्य विभागावर टीका झाली. रोज बाधितांची संख्या दहा हजाराहून अधिक होऊ लागली. त्यामुळेच मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी आरोग्यमंत्रीपद डॉ. सुधाकर यांच्याकडे सोपविले आहे. दसरा साध्या पद्धतीने झाला. आता दिवाळी तोंडावर आली आहे. दिवाळीत थोडेसे जरी दुर्लक्ष झाले तरी ते महागात पडणार आहे. पुढच्या पाच ते सहा महिन्यात अनेक निवडणुका होणार आहेत. सध्या शिरा व आर.आर.नगर विधानसभांसाठी पोटनिवडणूक होत आहे. या पाठोपाठ बेळगाव लोकसभा मतदार संघासाठीही निवडणूक होणार आहे. नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरमध्ये ग्राम पंचायत निवडणुका होणार आहेत. त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्मयता आहे. आता कोठे कोरोना नियंत्रणात येत आहे. त्यामुळे सध्या निवडणुका नकोत अशी मागणी वैद्यकीय शिक्षण व आरोग्य मंत्री डॉ. सुधाकर यांनी केली आहे.
कोरोनामुळे सध्या शाळा, कॉलेज बंद आहेत. पुढच्या महिन्यात कॉलेज उघडण्यासंदर्भात पुन्हा चर्चा सुरू आहे. एलकेजीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे सुमारे 30 टक्के मुलांना डोळय़ांची समस्या सतावू लागली आहे. सतत मोबाईल, लॅपटॉप व कॉम्प्युटरची स्क्रीन पहात राहिल्यामुळे लहान मुलांच्या डोळय़ांना फटका बसतो आहे. त्याचा विचार करून ऑनलाईन क्लास कितीचा असावा याची रूपरेषा राज्य सरकारने जाहीर केली आहे. एलकेजी, युकेजीसाठी आठवडय़ातून केवळ तीन दिवस, पहिली ते पाचवीपर्यंत केवळ अर्धा तासांचा क्लास असावा, अशी नियमावली ठरविण्यात आली आहे. तिसरी ते पाचवीपर्यंत आठवडय़ातून 5 दिवस, सहावी ते आठवीपर्यंत आठवडय़ातील 5 दिवस, 30 ते 45 मिनिटांचे 3 क्लास घेण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. नववी, दहावीच्या मुलांसाठी आठवडय़ातून 5 दिवस रोज 30 ते 45 मिनिटांचे 4 क्लास घेण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. सध्या शाळा, कॉलेजना सुट्टी आहे. त्यामुळे ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण द्यावेच लागणार आहे. ऑनलाईन शिक्षण देताना मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये याचा विचार करून तज्ञ समितीने केलेल्या शिफारसीनुसार ऑनलाईन क्लाससाठी मार्गसूची ठरविण्यात आली आहे.
शिरा व आर.आर.नगर पोटनिवडणूक आणि बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कर्नाटकात मोठे बदल होणार, अशी शक्मयता वर्तविण्यात येत आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या जागेवर अन्य नेत्याची नियुक्ती करण्यासंदर्भात विचार सुरू आहे. भाजप नेते उघडपणे या विषयावर भाष्य करू लागले आहेत. काँग्रेसमध्येही पुढचा मुख्यमंत्री कोण यावर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यात चढाओढ सुरू आहे. उघडपणे कोणीही भाष्य करू नका, अशी सूचना हायकमांडने या दोन्ही नेत्यांना दिली आहे. माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील-यत्नाळ व मंत्री व्ही. सोमन्ना यांच्यातील स्फोटक संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यावरून काँग्रेस, भाजप या दोन्ही पक्षात परिस्थिती ठीक नाही, हे दिसून येते. बिहार विधानसभा निवडणूक निकालानंतर कोणता निर्णय होणार याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण कर्नाटकात नेतृत्वबदल झाला तर पक्षाला धक्के बसणार आहेत. हे धक्के कमी करून नेतृत्व बदल कसा करता येईल याचा विचार निश्चित केला जात आहे. भाजपसाठी नवा चेहरा कोण याची उत्सुकता लागून राहिली आहे. पुढील तीन वर्षे येडियुराप्पा हेच मुख्यमंत्रीपदावर राहतील, असे त्यांचे समर्थक सांगत आहेत. पक्ष श्रेष्ठींच्या मनात काय आहे हे बिहार निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
रमेश हिरेमठ