बेंगळूर/प्रतिनिधी
तौक्ते चक्रीवादळामुळे आतापर्यंत ४ जणांना जीव गमवावा लागला असून सहा जिल्ह्यांतील ७३ गावांना या वादळाचा फटका बसला आहे, अशी माहिती कर्नाटक राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.
रविवारी सकाळी कर्नाटक राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. दक्षिण कन्नड, उडुपी, उत्तर कन्नड, कोडगू, शिवमोगा, चिकमंगळूर आणि हसन इत्यादी जिल्ह्यांमधील १७ तालुका व सात जिल्ह्यातील ७३ गावांना तौक्ते वादळाचा तडाखा बसणार असल्याचे सांगितले जाते.
बचाव व मदत कार्यासाठी सूचना
दरम्यान, मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी रविवारी संबंधित जिल्ह्याच्या प्रभारी मंत्री व तेथील उपायुक्त यांना बाधित भागाची भेट देऊन बचाव व मदतकार्य करण्याचे निर्देश दिले. राज्य सरकारकडून आपत्कालीन मदतीची गरज भासल्यास त्यांनी संबंधित मंत्र्यांना किंवा थेट त्यांना फोन करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
गृहमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, वादळग्रस्त जिल्ह्यांमध्ये अग्निशमन दलाचे सुमारे १,००० प्रशिक्षित कर्मचारी, पोलीस, होमगार्ड, एनडीआरएफ पथके तैनात करण्यात आले आहेत आणि बचाव आणि मदत कार्यात समन्वयाने कार्यरत आहेत.
उडुपी जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान
‘तौक्ते’ चक्रीवादळ कर्नाटक किनारपट्टीवर धडकले असून याचा सर्वाधिक प्रभाव उडुपी जिल्ह्यात दिसून आला आहे. तेथील २८ गावांना तडाखा बसला आहे. उत्तर कन्नड, उडुपी, चिकमंगळूर आणि शिवमोगा जिल्ह्यात आतापर्यंत एकाचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. उत्तर कन्नड जिल्ह्यात मासेमारी करणाऱ्या एका मच्छिमारला दुसऱ्या होडीने धडक दिली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. उडुपी येथे विजेच्या तारा तुटल्याने एकाचा मृत्यू झाला.
त्याचप्रमाणे चिकमंगळूर आणि शिवमोगा येथे घर कोसळल्यामुळे आणि वीज कोसळल्याने प्रत्येकी एकाच मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण ३१८ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. यातील २९८ लोक सध्या ११ मदत केंद्रसत श्रय घेत आहेत. आतापर्यंत एकूण ११२ घरे, १२२ खांब, २२ ट्रान्सफॉर्मर, ११ हेक्टर बागायती पिकांचे नुकसान झाले आहे.
सहा जिल्ह्यात मुसळधार पाऊस
गेल्या 24 तासात चक्रीवादळाच्या वादळामुळे तीन किनारपट्टी जिल्हा (दक्षिणा कन्नड, उडुपी आणि उत्तरा कन्नड) आणि तीन मालनाड जिल्ह्यात (शिवमोगा, कोडगू आणि चिकमंगळूर) जोरदार ते मुसळधार पाऊस झाला आहे. उडुपी जिल्ह्यातील कुंडापुरा तालुक्यातील नाडा स्टेशनमध्ये सर्वाधिक ३८५ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले असून झाडे कोसळली आहेत.