बेंगळूर/प्रतिनिधी
लॉकडाऊन दरम्यान मोठ्या प्रमाणात जंगलांचा नाश आणि शेकडो एकर जागेवर अतिक्रमण केले आहे, असे कर्नाटक जैवविविधता मंडळाने म्हंटले आहे. वृक्षतोड आणि जागेवर अतिक्रमण झाले कारण विविध विभागांचे अधिकारी साथीच्या आजाराशी लढा देण्यावर भर देत होते.
जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष अनंत हेगडे यांनी वनमंत्र्यांना सादर केलेल्या एका संक्षिप्त अहवालात म्हटले आहे की चिक्कमंगळूर आणि शिवमोगा जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांत शेकडो एकर जंगल नष्ट झाले आहे.
दोन जिल्ह्यांत असलेली अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे तोडण्यासाठी उत्खनन आणि विद्युत उपकरणांचा उपयोग केला जात होता, असे हेगडे म्हणाले. त्यामुळे वन, वन्यजीव आणि जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी बनविलेल्या कायद्यांच्या उल्लंघनाला आळा घालण्यासाठी वनमंत्र्यांनी तातडीने या भागांचा दौरा करावा, असे ते म्हणाले, वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी आणि गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी सर्वेक्षण करावे, असे म्हंटले आहे.
दरम्यान हेगडे यांच्या पत्रात वेगवेगळ्या भागातील नुकसानीचे प्रमाण सांगितले असून दोषींना शोधण्यासाठी चौकशीची मागणी केली आहे. जंगलांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांनी शिबिरे लावण्याचे आवाहन केले आहे. हेगडे म्हणाले, जैवविविधतेचे आकर्षण केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिरुरजवळील वाघारेहळ्ळी येथील डोंगरावरील होगारेकानुगिरी जवळ १२ ठिकाणी ४८० एकर जंगल नष्ट झाले आहे.
कोट्टीघेरा जवळील बालूर रिझर्व फॉरेस्टमध्ये गेल्या दोन आठवड्यात ४७२ पेक्षा जास्त मोठी झाडे तोडली गेली आहेत. कोप्पा तालुक्यातील बासरीकट्टे आणि देवगोडा या गावात जंगलातील वृक्षांची मोठ्या प्रमाणाततोड झाली आहे.