विट्यात कर्नाटक घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस कडून निषेध
प्रतिनिधी / विटा
कर्नाटकमध्ये अनेकवेळा कानही संघटनांचे कार्यकर्ते आणि भाजपप्रणित यंत्रणा मराठी माणसांवर अन्याय करीत आहे. कर्नाटकात सातत्याने मराठी अस्मितेची गळचेपी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय भाजपला मतदान मिळत नाही. परंतु आत्ता कोणतीही मोठी निवडणूक नसल्यामुळे मोदी सरकार कर्नाटकच्या घटनेबाबत गप्प आहे, असा आरोप माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी केला.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि अस्मिता असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची कर्नाटक राज्यात विटंबना झाल्याचे समजल्यानंतर याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्राभर उमटत आहेत. विट्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर कार्यकर्त्यांनी एकत्र येवून संबंधित घटनेचा निषेध केला.यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक, विधानसभा क्षेत्राध्यक्ष सुशांत देवकर, तालुकाध्यक्ष किसनराव जानक, युवक तालुकाध्यक्ष हर्षवर्धन बागल, शहराध्यक्ष अविनाश चोथे, माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर, शहर कार्याध्यक्ष विशाल पाटील, फिरोज तांबोळी, गजानन निकम, अॅड संदीप मुळीक, संभाजी मोरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
विघ्नसंतोषी लोकांकडून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न- अॅड. मुळीक
जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक म्हणाले, संपूर्ण जगात आज छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. मात्र कर्नाटकात काही विघ्नसंतोषी लोक समाजात फूट पाडण्यासाठी अशा प्रकारची कृत्ये करीत आहेत. भाजपचे सरकार कर्नाटकात आल्यापासून मराठी माणूस आणि मराठी अस्मितेची उघड गळचेपी सुरू आहे. त्यातूनच मराठी भाषिक लोकांवर कन्नड सक्ती करणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणे, असे प्रकार सुरू आहेत.
यातून भारतीय जनता पार्टीची मनोवृत्ती दिसून येते. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव केवळ राजकीय स्वार्थापोटी वापरायचे आहे, असा आरोप अॅड. मुळीक यांनी केला. यावेळी श्रीकांत कोरटे, समीर शेख, अभिजीत कदम, कुलदीप भिंगारदेवे, एकनाथ गडदरे, रोहन लिपारे, धनाजी पाटील, संजय सपकाळ, विनायक कचरे, मंगेश हजारे, शिवलिंग भाजीभाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.