न्यायालयीन लढाई अथवा 1993 चा व्यवहारीय तोडगाही मान्य : खानापुरात काळय़ादिनी लाक्षणिक उपोषण : म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांचा लक्षणीय सहभाग
वार्ताहर /खानापूर
सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी लोकशाही मार्गाने आतापर्यंत अनेक लढे उभे करण्यात आले. सीमाचळवळीत लढताना अनेकांनी हौतात्म्यही पत्करले. कारावासाची शिक्षा भोगली, पण सीमाप्रश्न सुटू शकला नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सीमाप्रश्न संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेऊन 2004 साली दावा दाखल केला. गेली 17 वर्षे न्यायालयीन लढाई सुरू आहे. पण या लढय़ाला अपेक्षित बळ मिळत नसल्याने महाराष्ट्र सरकारने केंद्रावर दबाव टाकून प्रश्न निकालात आणावा किंवा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली 1993 च्या तडजोडीच्या व्यवहारीय तोडग्यातून सीमाप्रश्नाचा निकाल लावावा. जोपर्यंत या प्रश्नाचा निकाल लागत नाही तोवर न्यायालयीन लढाईबरोबरच तडजोडीची तसेच रस्त्यावरची लढाई देखील अत्यंत महत्त्वाची आहे. यासाठीच शनिवारी कोल्हापुरात एकदिवसीय आंदोलन हाती घेण्यात आले होते, असे प्रतिपादन खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष व माजी आमदार दिगंबर पाटील यांनी काळय़ादिनी खानापूर येथील ज्ञानेश्वर मंदिरात आयोजित केलेल्या लाक्षणिक उपोषणणानंतर झालेल्या सभेत केले.
सीमासत्याग्रही वसंत नावलकर म्हणाले, 1956 साली भाषावार प्रांतरचना झाली. तेव्हांपासून आम्हाला आमच्या न्याय हक्कासाठी झगडावे लागत आहे. सीमाप्रश्नासाठी आम्ही सहा महिने तुरुंगवास भोगला. पण कदापी मागे वळून पाहिले नाही. पण आतापर्यंत समितीच्या जिवावर सत्ता भोगलेल्या माजी आमदारांनी संघटनेशी द्रोह केला आहे. त्याला हुतात्मे माफ करणार नाहीत. अशा संघटना द्रोही माजी आमदारांचा निषेध करत असल्याचे ते म्हणाले.
समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते नारायण पाटील म्हणाले, गेली 65 वर्षे मराठी भाषा, मराठी संस्कृती टिकवण्यासाठी येथील मराठी माणूस अहोरात्र प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्रात जाण्याची आमची सदोदित तळमळ सुरू आहे. सीमाप्रश्न सुटावा व आम्ही महाराष्ट्रात जावे हीच आमची इच्छा आहे.
म. ए. समितीचे कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे म्हणाले, सीमाप्रश्न सुटावा म्हणून वृद्धांपासून येथील तरुणही मातृभाषेसाठी विशेषतः महाराष्ट्रात जाण्यासाठी लढत आहेत. त्यांच्या लढय़ाला एक दिवस निश्चितच यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. म. ए. समितीचे चिटणीस आबासाहेब दळवी म्हणाले, कर्नाटक सरकारकडून मराठी माणसावरची दडपडशाही वाढत जाणार आहे. त्यासाठी मराठी माणसांनी एकत्र येणे गरजेचे आहे. जि. पं. माजी सदस्य जयराम देसाई म्हणाले, सीमाभागातील मराठी माणूस महाराष्ट्रात गेल्याशिवाय सुखी आणि समाधानाने जगू शकणार नाही.
सीमासत्याग्रही नारायण लाड, शंकरमामा पाटील, टी. वाय पाटील, पुंडलिक चव्हाण आदीनी मराठी माणसाच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी 1956 पासून आम्ही सीमासत्याग्रहात सातत्याने भाग घेत आहे. शिक्षा भोगली आहे. जोपर्यंत सीमाप्रश्न सुटत नाही, तोपर्यंत आम्ही लढतच राहणार आहे. महाराष्ट्र सरकारने या प्रश्नाकडे लक्ष देऊन सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी केली. तसेच खानापुरातील समितीच्या दोन्ही गटांनी व्यक्तीस्वार्थ व मतभेद बाजुला ठेवून एकत्र यावे, असे आवाहन केले. समितीचे शहर अध्यक्ष विवेक गिरी, प्रकाश चव्हाण, विलास बेळगावकर, मुरलीधर पाटील, शंकर पाटील, शंकर गावडा, महादेव घाडी, अध्यक्ष नारायण कापोलकर व कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले.
जि. पं. माजी सदस्य नारायण कार्वेकर, डी. एम. भोसले, शिवाजी पाटील, बी. बी. पाटील, लक्ष्मण पाटील, विठ्ठल गुरव, मऱयाप्पा पाटील, संजय पाटील, मल्हारी खांबले, भैरु कुंभार, एन. एन. पावले, ईश्वर बोबाटे, यशवंत पाटील, डी. एम. गुरव, लक्ष्मण जांबोटकर, विठ्ठल अडकूरकर, परशराम पाटील, पांडुरंग गुरव, कृष्णा मन्नोळकर, नारायण पाटीलसह कार्यकर्ते उपस्थित होते.
काळय़ादिनी युवकांचा सहभाग
काळय़ादिनी लाक्षणिक उपोषणाला युवकांनीही आपला सहभाग दर्शवला होता. त्यामुळे सीमाप्रश्नाच्या चळवळीत चौथी पिढीही सक्रिय असल्याचे यावेळी दिसून आले.