बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोना वाढत्या घटनांबाबत बुधवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे. मुख्यमंत्र्यांनी कोरोना परिस्थितीत कोणताही बदल का झाला नाही आणि अपेक्षित निकाल का मिळत नाही असा जाब अधिकाऱ्यांना यावेळी विचारला.
मुख्यमंत्री निवासी कार्यालय कृष्णा येथे लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री यांनी, नागरिकांना योग्य वेळी उपचार मिळत नाहीत. लोक रुग्णालयाच्या चकरा मारत आहेत. रुग्णांना रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध नाहीत. अंत्यसंस्कार करण्यात समस्या उद्भवत आहेत. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत. परिस्थिती कधी नियंत्रित येईल. प्रत्येक कृतीसाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची गरज असते का? अधिकाऱ्यांची जबाबदारी नाही का? असे अनेक प्रश्न यावेळी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना विचारले. कर्नाटकात रुग्णसंख्या वाढत असल्याने मुख्यमंत्री यावेळी चांगलेच आक्रमक झालेले पहायला मिळाले.
तक्रारी आल्यास स्थानिक अधिकारी जबाबदार असतील
येत्या काही दिवसांत शहरातील कोणत्याही प्रभागात अशा काही तक्रारी आल्या तर त्याला स्थानिक अधिकारी जबाबदार असतील असा इशारा मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिला. मुख्यमंत्री म्हणाले की अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रभागांमधील समस्या संवेदनशीलतेने सोडवाव्या लागतील, कोणतीही वैद्यकीय समस्या उद्भवू नये, यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच याचे पालन करणे प्रशासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी असेल. स्थानिक पातळीवर समस्या असल्यास लोकप्रतिनिधींशी संवाद साधा आणि ही समस्या सोडवा. लोकांना लवकरात लवकर दिलासा मिळाला पाहिजे. असेही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
कोठेही वैद्यकीय समस्या उद्भवू नये
रुग्णाला रुग्णालयात दाखल होण्यासाठी रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करावी लागत आहे. यासाठी भाड्याने रुग्णवाहिका घेऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था करा. मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागांमध्ये समन्वय ठेवण्यास सांगितले आहे. कंटेनमेंट झोनमध्ये असणारे नागरिक मार्गदर्शक नियमांचे उल्लंघन करत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असे मुख्यमंत्र्यांनी म्हंटले आहे. या बैठकीस सहकारमंत्री एस.टी. सोमशेखर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.