बेंगळूर/प्रतिनिधी
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कर्नाटक, केरळ, तामिळनाडू हे आता कोरोनाचे नवे हॉटस्पॉट बनत आहेत. वाढत्या कोरोनसंख्येमुळे केंद्र सरकार चिंतेत आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रमधील कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात स्थिरावली व दिल्लीतील रुग्णसंख्या घटली आहे. मात्र महारष्ट्रानंतर कर्नाटकात कोरोना रुग्णांचीच संख्या जास्त आहे. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या तीन राज्यांत गेल्या ६ दिवसांत रुग्णसंख्या २० टक्क्यांनी वाढली आहे.
महारष्ट्रानंतर कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेतच पण त्यानंतर कर्नाटकने दुसरा क्रमांक मिळविला आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या राज्यांच्या क्रमवारीत केरळ तिसऱ्या व तामिळनाडू पाचव्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशमध्ये रुग्णांच्या संख्येत घट होत आहे तर दक्षिण भारतात आंध्र प्रदेशसहित चार राज्यांमध्ये सहा दिवसांत रुग्णसंख्या वाढत आहे.
कर्नाटकमध्ये कोरोना रुग्णसंख्या १ मे रोजी ४०,९९० होती. ती ६ मे रोजी ४,९०,०५८ वर पोहोचली. ही रुग्णवाढ २१ टक्के होती. या राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण २९ टक्के असून ते देशात सर्वाधिक आहे.
केरळमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण २० टक्के आहे. कोरोनावर यशस्वी मात करणाऱ्या राज्यांमध्ये केरळ आघाडीवर होते. तिथे लसीकरण व कोरोना चाचण्यांचे प्रमाण देशात सर्वाधिक होते. पण आता केरळमध्ये कोरोना प्रसाराचा वेग वाढत आहे.