बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक अप्पर भद्रा प्रकल्पाच्या निविदामध्ये घोटाळा झाल्याचे भाजपच्या आमदाराने म्हंटले होते. वित्त विभागाकडून कोणतीही मंजुरी न घेता पाटबंधारे विभागाने कोट्यवधी रुपयांची निविदा काढली. २१,४७३ कोटी रुपयांचा येडियुरप्पा सरकारने घोटाळा केल्याचा आरोप भाजप आमदार ए. एच. विशवनाथ यांनी केला होता. या आरोपानंतर राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी निविदा प्रक्रिया पारदर्शक आणि केटीटीपी कायद्यातील तरतुदी आणि मंडळांनी घेतलेल्या निर्णयांनुसार पार पडली आहेत, असे ते म्हणाले. यामध्ये सर्व काही खुले आहे, त्यात काहीही घोटाळा झालेला नाही, ” असे बोम्माई यांनी एका प्रश्नाच्या उत्तरास सांगितले. दरम्यान गृहमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, आरोप करणे हे विरोधी पक्षाचे कर्तव्य आहे, परंतु जलसंपदा विभाग सचिवांनी सत्यता स्पष्ट केली आहे. “जेव्हा सत्य ओळखले जाते तेव्हा तपासाची काय गरज आहे,” असे त्यांनी म्हंटले.
कॉंग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी विश्वनाथ यांच्या आरोपाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) चौकशी करावी अशी मागणी केली आहे. तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी संयुक्त गृह समितीच्या चौकशीची मागणी केली आहे. अप्पर भद्रा प्रकल्पासाठी वित्त विभागाच्या परवानगीशिवाय २१,४७३ कोटी रुपयांची निविदा काढल्याचा आरोप विश्वनाथ यांनी अलीकडेच केला होता.
तथापि, जलसंपदा सचिव लक्ष्मणराव पेशवे यांनी त्यानंतर हे वक्तव्य निराधार असून निविदा प्रक्रिया पूर्णपणे “पारदर्शक” असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांचा मुलगा बी. वाय. विजयेंद्र यांनी प्रकल्पात दहा टक्के वाट मिळाल्याचा आरोपही विश्वनाथ यांनी केला होता.
तसेच भाजपचे आमदार अरविंद बेल्लद यांच्या फोन-टॅपिंगच्या आरोपांच्या चौकशीच्या प्रश्नाला उत्तर देताना बोम्माई म्हणाले, “चौकशी सुरू आहे … पोलीस माहिती गोळा करत आहेत.” येडियुरप्पा यांच्या बदलीची मागणी करणाऱ्या पक्षाच्या गटामधील हुबळी-धारवाडचे आमदार बेल्लद यांनी गुरुवारी त्यांचा फोन टॅप केला जात असल्याचा आरोप केला होता.