बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्यात पूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. संपूर्ण राज्यात कडक लॉकडाऊनची अमंलबजावणी सुरू असताना नागरिकांकडून नियमांचे उल्लंघ होत आहे. दरम्यान विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई करत वाहने जप्त केली आहेत. तसेच काही वाहन चालकांवर गुन्हेही दाखल केले आहेत. दरम्यान, कोर्टाने जप्त करण्यात आलेली १.५१ लाख वाहने सोडण्यास परवानगी दिली आहे.
दरम्यान राज्यात लॉकडाऊनच्या काळात पोलिसांकडून जमा करण्यात आलेली १.५१ लाख वाहने सोडण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. वाहन सोडताना वाहनधारकांकडून किरकोळ रक्कम घेण्यात येणार आहे. १.३७ लाख दुचाकी वाहनधारकांकडून प्रत्येक वाहनाला ५०० रूपये दंड घेण्यात येणार असून ७,४०० चारचाकी वाहनधारकांकडून प्रत्येकी १ हजार रूपये तर इतर वाहनमालकांकडून २ हजार रुपये दंड प्रत्येक वाहनाला घेण्यात येणार आहे.
कोर्टाने दंड आकारूनच या वाहनांना सोडण्यास परवानगी दिली आहे. निश्चित केलेले शुल्क भरून वाहनचालक आपली वाहने घेऊन जाऊ शकतात. दरम्यान, लॉकडाऊन असेपर्यंत पोलीस नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करणार आहेत. विनाकारण घराबाहेर पडल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असून वाहनचालकांची वाहने जप्त केली जाणार आहेत.