बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोनाची संख्या वाढू लागल्यानंतर राज्यात पूर्ण लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. दरम्यान राज्यात १४ जून पर्यंत लॉकडाऊन आहे. राज्यात अनलॉक करण्याबाबत विचार सुरु आहे. मुख्यमंत्री याविषयी सर्वांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत. दरम्यान पुढील आठवड्यात कर्नाटकमधील अनलॉक प्रक्रियेच्या संभाव्यतेचे संकेत देताना महसूलमंत्री आर. अशोक यांनी बुधवारी सांगितले की राज्य सरकार चार ते पाच वेगवेगळ्या टप्प्यांत अनलॉक करण्याच्या विचारात आहे, असे म्हंटले.
सर्वप्रथम, सरकार सध्याच्या खरेदीची वेळ दुपारी १२ पर्यंत वाढविण्याच्या विचारात आहे. याशिवाय लोकांना व्यायामासाठी उद्यानांना भेट देण्यासंबंधीही विचार केला जात आहे.
निमहंस कन्व्हेन्शन सेंटर येथे बीबीएमपीतर्फे बालरोग तज्ञांसाठी आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना महसूलमंत्री आर. अशोक म्हणाले, “सरकार दररोजच्या प्रकरणांचे भान ठेवून ४ ते ५ टप्प्यात अनलॉक करण्याचा विचार करीत आहे. परंतु सर्व काही होईल एकाच वेळी सुरु केल्यास पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री येडियुरप्पा या वर्गीकृत आणि टप्प्याटप्प्याने अनलॉक प्रक्रियेचा निर्णय घेतील. “
बेंगळूरच्या कोरोना आकडेवारीकडे लक्ष वेधत अशोक पुढे म्हणाले, “बेंगळूरमध्ये सध्या सुमारे २,००० प्रकरणांची नोंद झाली आहे . जर आपल्याला सामान्य जीवन जगायचे असेल तर कोरोना रुग्णांची संख्या ५०० च्या पर्यंत खाली आली पाहिजे. सकारात्मकता काय असेल त्याचे आम्ही विश्लेषणही करणार आहोत, असे ते म्हणाले.
राज्य सरकार विचारात असलेल्या विश्रांतीबद्दल विचारले असता आर अशोक म्हणाले, सुरुवातीला आम्ही सध्याचे खरेदीचा वेळ वाढवण्याचा विचार करीत आहोत जे सध्या सकाळी ६.०० ते सकाळी १०.०० पर्यंत आहे. ही वेळ दुपारी १२ पर्यंत वाढवली जाऊ शकते. त्याचप्रमाणे सकाळ, संध्याकाळ चालणे किंवा जॉगिंगसाठी लोकांना उद्यानांमध्ये जाण्याची परवानगी दिली जाऊ शकते. ” मंत्र्यांनी स्पष्ट केले की सध्या कोणतेही नवीन उद्योगांना (ज्याला सध्या काम करण्यास परवानगी आहे त्या व्यतिरिक्त) काही काळ काम सुरू करण्यास परवानगी दिली जाणार नाही.