बेंगळूर/प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री आणि जद-एस नेते एच.डी. कुमारस्वामी यांनी पोटनिवडणुकीत राष्ट्रीय पक्ष भाजप आणि काँग्रेस नेत्यांचे अपयश हा निवडणुकीचा मुद्दा असणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
राजराजेश्वरी नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार व्ही. कृष्णमूर्ती यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना कुमारस्वामी त्यांनी दोन्ही राष्ट्रीय पक्ष राज्याचे हित जपण्यात अपयशी ठरले आहेत. जनता दल-एस सारखा प्रादेशिक पक्षच राज्याच्या हिताचे रक्षण करू शकतो, असा दावा त्यांनी केला.
तसेच पाण्याची वाटणी असो वा नैसर्गिक आपत्ती दरम्यान केंद्र सरकारकडून अनुदान मिळण्याची बाब असो, दोन्ही प्रमुख राजकीय पक्ष अपयशी ठरले आहेत. जनता दल-एस या मुद्यावर मतदारांचा पाठिंबा मिळवेल आणि निवडणूक जिंकेल.
भाजपकडे २५ खासदार असूनही, सर्व खासदार कर्नाटकला वस्तू व सेवा कर (जीएसटी) चे १३ हजार कोटी रुपयांची थकबाकी मिळविण्यात अपयशी ठरले आहेत. कोरोना महामारीचा सामना करत असलेल्या कर्नाटकला पंतप्रधान सहाय्यता निधीतून कोणतीही मदत मिळालेली नाही. त्यामुळे हे भाजपचे अपयश नाही का? असा सवाल कुमारस्वामी यांनी केला आहे.
दरम्यान डीजे हळ्ळी आणि केजी हळ्ळी येथील हिंसाचार प्रकरणी काँग्रेस नेत्यांवर आरोपपत्र दाखल केले आहेत. त्यामुळे काँग्रेसचा खरा चेहरा उघडकीस आला आहे.