आरोग्य खात्याकडून खबरदारी : अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
प्रतिनिधी/ बेंगळूर
जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्याने कर्नाटक, महाराष्ट्रासह देशभर भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्य खात्याने सार्वजनिक ठिकाणी सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. आतापर्यंत कर्नाटकात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढलेला नाही. 750 हून अधिक संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच संशयित 400 पेक्षा अधिक रुग्णांची रक्ततपासणी केली आहे. यापैकी 324 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अधिक सतर्कता बाळगण्यात आली आहे. तसेच कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आल्यास किवा माहिती मिळाल्यास तात्काळ 104 क्रमांकावर संपर्क साधण्याची सूचनाही आरोग्य खात्याने दिली आहे.
महाराष्ट्रातही एकही कोरोना संशयित रुग्ण नसूनही आरोग्य विभागकडून काळजी घेतली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी माध्यमांतून जनप्रबोधन करण्यात येत असल्याचे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. महाराष्ट्रात कोरोनाच्या सध्या 15 जण निरीक्षणाखाली असून 258 जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर मुंबई तसेच पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर 904 विमानांमधील 1 लाख 9 हजार 118 प्रवासी तपासण्यात आले आहेत.
राज्यात पुणे व नागपूर विमानतळावरही क्रिनिंग सुरू झाले आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून 560 प्रवासी आले असून 305 जणांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. आजपर्यंत रुग्णालयात भरती आलेल्यांपैकी 258 जणांचा अहवाल निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एनआयव्ही पुणे यांनी दिला आहे. इतर 15 जणांचे अहवाल उद्या प्राप्त होतील. दरम्यान कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन केले आहे.
कोरोना जागरुकता कॉलर टय़ून…
कोरोनाबाबत मोठय़ा प्रमाणात जागरुकता करण्यात येत आहे. त्यासाठी फोनवरील रिसिव्हींग रिंग न वाचता जागरुकता संदेशाची कॉलर टय़ून वाजत असल्याचे दिसून येते. कोरोनाला प्रतिबंधित करु जाऊ शकते. खोकताना शिंकताना तोडावर स्वच्छ रुमाल ठेवा, असे आवाहन या टय़ूनमधून करण्यात येत आहे.