मध्यवर्ती बसस्थानकातून विविध मार्गांवर धावणार 40 बसेस
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना, लॉकडाऊन आणि महाराष्ट्रात सुरू असलेल्या कर्मचाऱयांच्या संपामुळे मागील काही महिन्यांपासून ठप्प झालेल्या कर्नाटक-महाराष्ट्र बससेवेला मंगळवारपासून प्रारंभ होणार आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून महाराष्ट्रातील विविध शहरांकडे थोडय़ा-थोडय़ा प्रमाणात बसेस धावणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रण अधिकारी पी. वाय. नाईक यांनी दिली. सकाळी 6 वाजल्यापासून लांब पल्ल्याच्या बस विविध शहरांकडे धावणार आहेत. त्यामुळे कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य प्रवास करणाऱया प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
बसस्थानकातून मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली, मिरज, लातूर पंढरपूर, तुळजापूर, औरंगाबाद, बार्शी आदी शहरांकडे बसेस धावणार आहेत. महाराष्ट्रातील विविध मार्गांवर 40 हून अधिक बसेस आंतरराज्य प्रवासासाठी धावणार आहेत. कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य बससेवा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील काही महिन्यांपासून बंद आहे. मध्यंतरी बससेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र त्यानंतर पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने बससेवा लांबणीवर पडली. दरम्यान महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे कर्मचारी मागील काही महिन्यांपासून संपावर असल्याने आंतरराज्य बससेवा थांबली आहे. त्यामुळे दोन्ही परिवहन मंडळांना मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्रात बससेवा सुरू करण्यासाठी परिवहनने पोलीस खात्याला देखील याबाबत कळविले आहे. शिवाय खबरदारी म्हणून सुरक्षितता पुरविण्याच्या सूचना केल्या आहेत.
बेळगाव विभागातील चार आगारासह रामदुर्ग, बैलहोंगल, खानापूर, संकेश्वर, निपाणी, बैलहोंगल, चिकोडी, गोकाक आदी आगारातून आंतरराज्य प्रवासासाठी बसेस धावणार आहेत. दरम्यान प्रवाशांना मास्क व इतर कोरोना नियमांचे पालन करून प्रवास करावा लागणार आहे.
बेळगाव आगारातून कर्नाटक-महाराष्ट्रात असा प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या अधिक असल्याने उत्पन्न चांगले मिळते. मात्र कोरोनामुळे कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य बससेवा ठप्प होती. त्यामुळे परिवहनला फटका बसला होता. आता महाराष्ट्रात हळूहळू बससेवा सुरू होणार असल्याने उत्पन्नात वाढ होणार आहे.
परिस्थिती पाहून बसेस सोडण्यात येणार
मंगळवारपासून महाराष्ट्रात बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र बुधवारपासून अधिक बसेस महाराष्ट्रात धावणार आहेत. याकरिता सुरक्षितता म्हणून पोलीस खात्याची मदत घेतली जाणार आहे. परिस्थिती पाहून बसफेऱया कमी-जास्त सोडल्या जाणार आहेत.
– पी. वाय. नाईक (विभागीय नियंत्रण अधिकारी)