बेंगळूर/प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हे राज्यातील राजकीय घडामोडींसंदर्भात चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. दरम्यान दिल्लीला जाण्याआधी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकातील राजकीय परिस्थिती तसेच नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व पक्षाच्या अन्य नेत्यांसमवेत चर्चा करणार करणार असल्याचे सांगितले. तसेच भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना भेटण्याचा देखील माझा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे राज्यातील भाजप नेत्यांच्या नजरा आता मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याकडे असणार आहेत.
याआधी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि नेतृत्व बदलावरून चर्चा सुरु होत्या. पण मुख्यमंत्र्यांनी मी मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचे म्हंटले होते. तसेच मंत्रीमंडळ विस्तार आणि फेरबदल याबाबत त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे बोट दाखविले होते. दरम्यान याआधीही मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ विस्तार करण्याबाबत दिल्ली वारी केली आहे.