बेंगळूर/प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील दलित मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी पोलिसांकडून राहुल गांधींना धक्काबुक्की झाली. यांनतर राहुल आणि प्रियांका यांना पोलिसांनी अटक केली. याघटनेचा काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. कर्नाटक काँग्रेस पक्षाच्या वतीनेही निषेध करण्यात आला आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी ट्विट करून दलित मुलीवर झालेला बलात्कार आणि प्राणघातक हल्ल्याला पोलिसांनी गांभीर्याने पाहिले नाही. तसेच तिच्या पालकांना शेवटचे अंत्य संस्कार करण्याची संधी न देता गुंडाराज केले असे ट्विट केले आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नैतिक जबाबदारीने राजीनामा द्यावा. योगींच्या सरकारमध्ये मुली सुरक्षित नाहीत. या प्रकरणी सरकारने वेळीच कार्यवाही केली नाही. यासाठी केवळ योगीच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे समर्थन करणारे संघ परिवार यांनाही जबाबदारी स्वीकारावी लागेल. दलित भाजप सरकारच्या काळात सुरक्षित नाहीत, असे सिद्धरामय्या यांनी म्हंटले आहे.
त्याचप्रमाणे आमदार दिनेश गुंडूराव यांनी नैतिक जबाबदारी घेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनी राजीनामा द्यावा. तसेच योगी सरकारच्या काळात दलितांवरील अत्याचार वाढला आहेत. आमदार यतींद्र व अन्य नेत्यांनीही घटनेचा तीव्र निषेध केला आहे.