प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्यात दहावीच्या परीक्षांना सोमवार दि. 28 पासून प्रारंभ झाला आहे.दरम्यान बेळगाव शहरातही आज सकाळपासूनच विद्यार्थ्यांसह पालकांची परीक्षा केंद्रावर उपस्थिती दिसून आली . हिजाब वरून गोंधळ होऊ नये म्हणून परीक्षा केंद्रावर पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. पालकांनाही परीक्षा केंद्रासमोर उभे राहण्याची परवानगी नाकारण्यात आली.
सध्या परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांनी मागील दोन वर्षांत कोरोनामुळे परीक्षा न दिल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला असल्याने विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
दहावी हा शिक्षणातील महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिला जातो. दहावीच्या गुणांवर पुढील शिक्षणाचा पाया अवलंबलेला असतो. त्यामुळे विद्यार्थी काही दिवसांपासून दहावीच्या परीक्षेची तयारी करीत आहेत. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे परीक्षा भीतीपूर्ण वातावरणात घेण्यात आल्या होत्या. परंतु यावेळी मात्र शिक्षण विभागाने योग्य पद्धतीने परीक्षेचे नियोजन केले आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही भीतीखाली परीक्षांना सामोरे न जाता आत्मविश्वासाने परीक्षा द्यायची आहे.