बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकातील लॉकडाऊन १४ जून रोजी संपणार आहे आणि गेल्या काही दिवसांत नवीन संसर्ग कमी झाल्याने राज्यात लवकरच अनलॉक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री याबाबत मंत्री आणि तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत.
सरकारने नियुक्त केलेल्या कोविड -१९ टेक्निकल अॅडव्हायझरी कमिटी (टीएसी) मधील तज्ज्ञांच्या पॅनेलने दुकाने, हॉटेल आणि मॉल्सला दररोज काही तास काम करण्यास परवानगी देण्याची शिफारस केली आहे. टीएसीने अधिक जोखीम असलेल्या जिल्ह्यांमधील लोकांच्या हालचालींवर निर्बंध घालण्याची सूचनाही केली आहे.
कोरोनाची संख्या कमी होत असली तरी अद्याप धोका टळलेला नाही. यासाठी राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक करावा लागेल. यापुढेही कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन केले पाहिजे. दुसरी लाट अजून कमी झालेली नाही. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.