बेंगळूर/प्रतिनिधी
लोकसंख्या दिनाच्या दिवशीच उत्तर प्रदेश सरकारने उत्तर प्रदेश लोकसंख्या धोरण २०२१-२०३० जाहीर केलं असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची यासंदर्भातील घोषणा केली. यांनतर भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांनी कर्नाटकमध्ये आसाम आणि उत्तर प्रदेशच्या धर्तीवर वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी नवीन लोकसंख्या धोरण आणण्याची तयारी दर्शविली.
“चिक्कमंगळूर सत्तारूढ भाजपचे आमदार असलेले रवी म्हणाले की, कर्नाटकने वाढती लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी आसाम आणि उत्तर प्रदेशच्या धर्तीवर नवीन लोकसंख्या धोरण आणण्याचा विचार केला आहे. दरम्यान, कर्नाटकचे कायदामंत्री बसवराज बोम्माई यांनी चर्चा आणि विचारविनिमयानंतर निर्णय घेण्यात येईल असे म्हटले होते.
दरम्यान, उत्तर प्रदेशात लोकसंख्या नियंत्रण विधेयकाचा मसुदा तयार करण्यात आला असून त्यामध्ये दोन अपत्ये धोरणाचे उल्लंघन करणाऱ्याला स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढता येणार नाही, त्याचप्रमाणे सरकारी नोकरीसाठी अर्ज करता येणार नाही आणि बढतीही मिळणार नाही. त्याशिवाय कोणत्याही प्रकारचे सरकारी अनुदान घेता येणार नाही, असे प्रस्तावित करण्यात आले आहे.