बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट (टीपीआर) सर्व ३१ जिल्ह्यांत ५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. सरकार १९ जुलैपासून रात्रीचा कर्फ्यू उठवण्याची आणि पब पुन्हा सुरु करण्याचा विचार करीत आहे, जेव्हा अनलॉक ४.० अस्तित्वात येईल.
५ जुलै रोजी अस्तित्वात आलेल्या अनलॉक ३.० नंतर राज्यात शनिवार व रविवारचा कर्फ्यू उठवून आणि शॉपिंग मॉल्स पुन्हा उघडल्यानंतर सरकार चौथ्या स्तरावरील सवलतीच्या परवानगीसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये टीपीआर ५ टक्क्यांच्या खाली येण्याची वाट पहात होता.
अनलॉक ३.० दरम्यान कर्नाटकमधील कोविड परिस्थितीने इच्छित परिणाम दर्शविला आहे, असे कोरोना तांत्रिक सल्लागार समितीचे (टीएसी) अध्यक्ष डॉ. के. सुदर्शन यांनी सांगितले.
दरम्यान अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा अधिक शिथिलता देण्याच्या बाजूने आहेत. मुख्यमंत्र्यांनी अनलॉक ४.० जाहीर करण्यापूर्वी शिफारसींवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी किंवा शनिवारी मंत्र्यांच्या गटाची बैठक घेण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यापर्यंत कोडगू आणि चिक्कमंगळूर हे दोन जिल्ह्यात टीपीआर ५ टक्क्यांहून अधिक होता, तर इतर जिल्ह्यांतील दर खाली होता.