बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधानपरिषदेच्या चार जागांसाठी बुधवारी मतदान झाले. दरम्यान या निवडणुकीसाठी ७१ टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या दोन तासांत मतदान दहा टक्क्यांपेक्षा कमी होते नंतर ते वाढले. दक्षिण-पूर्व पदवीधर, पश्चिम पदवीधर, उत्तर-पूर्व शिक्षक आणि बेंगळूर शिक्षक क्षेत्र या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीसाठी चाळीस उमेदवार रिंगणात आहेत. सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. २ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
चारही जागांवरील सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे निवडणुका घेण्यात आल्या. सर्व मतदारसंघांमधील मतदान सकाळी आठ वाजता सुरू झाले आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ५ वाजेपर्यंत पश्चिम पदवीधर क्षेत्रात ७०.११ टक्के, दक्षिण-पूर्व पदवीधर क्षेत्रात ७५ टक्के, ईशान्य शिक्षक क्षेत्रातील जागेसाठी ७३. ३२ टक्के आणि बेंगळूर शिक्षक क्षेत्रासाठी ६६ टक्के मतदान झाले आहे.
कोरोना काळात निवडणुका होत असल्याने खबरदारीच्या ठिकाणी मतदान केंद्रांवर कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यापूर्वीच मतदान केंद्रांच्या आसपास कलम१४४ लागू करण्यात आले होते. कर्मचार्यांनी तसेच मतदारांनी मास्क व शारिरीक अंतर पाळले पाहिजेत यासाठी निवडणूक आयोगाने मतदान कर्मचार्यांना निर्देश दिले होते. मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व मतदान केंद्रांवर हँड सॅनिटायझर आणि थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचवेळी वैद्यकीय पथकेही मतदान केंद्र आवारात तैनात होती.