बेंगळूर / प्रतिनिधी
धर्मांतर विरोधी विधेयक कायदा झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एक विशेष कार्यदल स्थापन करण्यात येईल असे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई म्हणाले. विधानसभेत विधेयक मंजूर झाले असून जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात मंजुरीसाठी सरकार ताकद लावण्याची शक्यता आहे.
“ हा कायदा अनेक वर्षे रखडला होता. येत्या काही दिवसांत कायदा बनल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मी एक विशेष कार्यदलही स्थापन करणार आहे, असे बोम्मई यांनी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत सांगितले. बोम्माई यांनी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या विधानाची नोंद घेऊन म्हटले की काँग्रेस सत्तेत आल्यास धर्मांतर विरोधी कायदा रद्द करण्याची भिती आहे.