प्रतिनिधी/ पणजी
म्हादई पाणी तंटा लवादाच्या निर्णयानुसार कर्नाटक सरकार कार्यवाही करणार असून म्हादई प्रकल्पांची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे कर्नाटकाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केले आहे. गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अवमान याचिकेबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच ती याचिका कशासाठी, कोणत्या आधारावर केली याची माहिती नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की लवादाने म्हादईप्रश्नी निकाल दिला असून त्यानुसार कर्नाटक राज्य सरकारने म्हादई प्रकल्पांसाठी रु. 500 कोटीची तरतूद केली आहे. शिवाय त्या प्रकल्पांना वन मंत्रालयाचा दाखला मिळावा म्हणून केंद्र सरकारकडे अर्ज करण्यात आल्याची माहिती जोशी यांनी दिली.
अवमान याचिका घेऊन सर्वोच्च न्यायालयात जाण्याची गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची कृती समजण्यासारखी नाही. कर्नाटकची बाजू योग्य असून लवादाच्या निर्णयानुसार आम्ही म्हादई प्रकल्प पुढे नेणार असल्याचे जोशी यांनी स्पष्ट केले.