मराठी भाषिकांवरील राज्यद्रोहाचे खटले मागे घेण्याची मागणी
कोल्हापूर / प्रतिनिधी
सीमाभागातील मराठी बांधवांना न्याय मिळवुन देण्यासाठी शिवसेनेने कर्नाटक सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे. राज्यद्रोहाचे गुन्हे दाखल करत अटक केलेल्या मराठी भाषिकांची त्वरीत मुक्तता करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. गुन्हे मागे न घेतल्यास शनिवार 22 रोजी कोल्हापूर ते बेळगांव असा छत्रपती शिवाजी महाराज सन्मान दांडी मार्च काढत तरुंग मुक्ती आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी दिला. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कर्नाटक पोलिसांनी कितीही अडवणूक केली तरी एक हजार शिवसैनिक बेगळगांवमध्ये दाखल होतील आणि मराठी भाषिकांच्या अटकेसंदर्भात बेळगांव जिल्हा प्रशासनाला जाब विचारतील असेही देवणे यांनी सांगितले.
जिल्हाप्रमुख देवणे म्हणाले, बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्य़ाचा काही कन्नड गुडांनी अवमान केला. याचा निषेध नोंदविण्यासाठी बेळगांवमध्ये रस्त्यावर उतरलेल्या मराठी भाषिकांची धरपकड करत कर्नाटक प्रशासनाने 61 जणांवर राज्यद्रोहाचे गुन्हे दाखल केले आहेत. कोणत्याही प्रकारची तोडफोड न करता अथवा कोणीही जखमी नसताना मराठी भाषिकांनी शांततेत निषेध नोंदवूनही त्यांच्यावर राज्यद्रोहाचे खटले कशाचे आधारे नोंद केले. तसेच अद्यापही अटक केलेल्या मराठी बांधवांची सुटका न झाल्याने संतप्त झालेल्या कोल्हापुरातील शिवसैनिकांनी कर्नाटक सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे. पत्रकार परिषदेला शिवसेना करवीर तालुका प्रमुख विराज पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख मंजीत माने, वैभव जाधव, अवदेश करंबे, अमित सोलापूरे आदी उपस्थित होते.
कोल्हापुरातील टाऊन हॉल येथे शनिवार 22 रोजी सकाळी 9 वाजता युगपरूष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीला अभिषेक करुन छत्रपती शिवाजी महाराज सन्मान दांडी मार्चला सुरवात होईल. यानंतर कागलमार्गे दांडी मार्च कोगनोळी टोलनाका परिसरात आल्यावर येथे सीमभागातील बांधवांच्यावतीने पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा, कुंभी, हिरण्यकेशी या पाच नद्यांचे पाणी आणुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीस दुग्धाभिषेक करण्यात येईल. यांनंतर दांडी मार्च बेळगांवकडे मार्गस्थ होणार असल्याचे देवणे यांनी सांगितले. दांडी मार्च आणि तुरुंगमुक्ती आंदोलनासाठी बेळगांव जिल्हा प्रशासनाची रितसर परवानगी घेणार आहे. त्यामुळे रितसर परवानगीनेचे हे आंदोलन होईल. परवानगी मिळविण्यासाठी लवकरच बेगळगांवला जाणार असल्याचे देवणे यांनी सांगितले.
आंदोलनामध्ये सीमाभागातील बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन करणार आहे. यासाठी बेळगांवचे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, संपर्क प्रमुख अरविंद नानुरे, महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिपक दळवी, मालोजीराव आष्टेकर आदींसह सीमा लढय़ातील अन्य प्रमुख नेत्यांची भेट घेणार असल्याचे देवणे म्हणाले.
कर्नाटक सरकार मराठी बांधवांच्या चळवळीचा आवाज दाबण्याचे नेहमीच काम करत आहे. सीमाबांधवांसाठी कोल्हापुरवासियांनी आवाज उठवल्यास महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कर्नाटक पोलीस मोठयासंख्येने दाखल होतात. मात्र यावेळी कर्नाटक पोलिसांनी कितीही दबाव टाकला तरी एक हजार शिवसैनिक बेळगांवात घुसुन मराठी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवणार आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान देशभरात शिवाजी महाराजांच्या शौर्याचे दाखले देतात. तर दुसरीकडे कर्नाटकमध्ये सत्तेवर असलेल्या भाजप सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ रस्त्यावर उतरलेल्या मराठी भाषिकांवर राज्यद्रोहाचे खटले दाखल केले जातात. यावरुन भाजपची दुटप्पी भुमिका दिसून येत असल्याचा आरोपही देवणे यांनी केला.