दोन मागण्यांवर सहमती -लाठीमाराची होणार चौकशी
वृत्तसंस्था/ कर्नाल
हरियाणाच्या कर्नाल जिल्हा प्रशासन आणि शेतकऱयांदरम्यान दोन मागण्यांवर सहमती झाली आहे. बसताडा येथे झालेल्या लाठीमाराची चौकशी आणि मृत आंदोलकाला नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर शासकीय अधिकारी आयुष सिन्हा यांनी रजेवर पाठविण्यात आले आहे. या निर्णयांनंतर शेतकऱयांचे धरणे आंदोलन संपुष्टात आले आहे.
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर गुरनाम सिंह चढूनी यांनी शेतकऱयांचे धरणे आंदोलन समाप्त करण्याची घोषणा केली आहे. त्याहंनी शेतकऱयांना आता दिल्लीच्या टिकरी आणि सिंघू सीमेवर जाण्याची सूचना केली आहे. तसेच मान्य करण्यात आलेल्या मागण्यांबद्दल माहिती दिली आहे.
एक महिन्यात पूर्ण होणार चौकशी
कर्नाल प्रशासनाचे अधिकारी बसताडा टोलनाक्यावर शेतकऱयांवर झालेल्या लाठीमाराची चौकशी करण्यास तयार झाले आहेत. याची चौकशी निवृत्त न्यायाधीश करणार असून ती एक महिन्यात पूर्ण केली जाईल. शेतकऱयांची ही मागणी मान्य करण्यासह प्रशासनाने आयएएस अधिकारी आयुष सिन्हा यांना रजेवर पाठविले आहे.
मृताच्या कुटुंबीयाला नोकरी
प्रशासनाने लाठीमारात मारले गेलेल्या शेतकऱयाच्या कुटुंबीयाला नोकरी देण्याची मागणीही मान्य केली आहे. प्रशासनाकडून मृताच्या कुटुंबीयाला एक आठवडय़ात नोकरी दिली जाणार आहे. पण अद्याप मृताचे कुटुंबीय तसेच जखमींना देण्यात येणाऱया भरपाईची रक्कम अद्याप निश्चित झालेली नाही. शेतकऱयांसोबत झालेल्या चर्चेत जिल्हाधिकारी निशांत कुमार यादव आणि पोलीस अधीक्षक गंगाराम पूनिया सामील झाले होते.