‘पेराल ते उगवेल’ हा निसर्गनियम आहे. एखादी चांगली किंवा वाईट गोष्ट व कृती जाणीवपूर्वक वा हेतुपूर्वक केली तर त्याचे कर्मफळ अनेक पटीत भोगावे लागते. हाच निसर्गनियम कर्माबाबतीत पण लागू पडतो. एक नारळ रुजवला तर तोच नारळ काही काळानंतर आपल्याला त्याच्या दहापट नारळ देतो. प्राणशक्ती उपचारासारख्या आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गावर चालताना हेतुपूर्वक केलेल्या कर्माची फळेसुद्धा शंभर पटीने मिळतात, मग ते कर्म चांगले करा अथवा वाईट, शंभर पटीने फळ मिळणार हे निश्चित! कोणत्याही प्रकारच्या ज्ञानाचा केलेला दुरुपयोग याची कर्मफळे अतिशय गंभीर व वेदनादायी असतात. म्हणूनच माणसाने दुष्कर्माऐवजी सत्कर्मे करावीत यातच शहाणपणा आहे. हा सांगितलेला उपदेश तुम्हाला आंधळेपणाने स्वीकारण्याची काहीच गरज नाही. तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात घडणाऱया घटना, प्रत्येक क्रियेला तुम्ही दिलेली प्रतिक्रिया आणि त्याचे होणारे सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम तुमचे तुम्हीच तपासून पहा.
हा कर्मगतीचा नियम खरंतर नुसता प्रारब्ध वा नशिबाचा खेळ किंवा विधिलिखित नसून तो पूर्णतः आपण निर्माण केलेल्या आणि दिलेल्या दिशेनेच अमलात येतो. त्यामुळे तुमच्या आयुष्यात असलेली दुःखे, वेदना यांचा दोष आई वडील, नातेवाईक, मित्रपरिवार किंवा इतर कोणालाही तुम्ही देऊ शकत नाही. तुम्हीच केलेल्या कर्माची फळे तुम्ही भोगता आहात, मग ती याच जन्मातील असतील असे नाही. उदा. आपण पाप पुण्याचा हिशोब घालत असतो. कोणते कार्य सकारात्मक, कोणते नकारात्मक याचा विचार करत असतो. आता हा पाप पुण्याचा हिशोब कसा ते आपण पाहू. समजा पुण्य म्हणजे तांदूळ (भात) आणि पाप म्हणजे गहू. शेतकरी खूप मेहनत घेतो. तांदूळ पेरतो, तांदूळ उगवतात म्हणजेच चांगले काम करतो तेव्हा चांगली फळं मिळतात आणि तेही शंभरपटीने. पण जेव्हा तो वाईट कर्म करतो म्हणजेच जेव्हा तो गहू पेरतो तेव्हा शंभरपटीने त्याला गहूच मिळतात. आता एका शेतकऱयाने तांदूळ पिकवले आणि ते तांदूळ एका टाकीत ठेवले. यानंतर दुसरा शेतकरी आला त्याने विचार केला आपल्या पूर्वजांनी तांदूळ पेरले आपणही तेच करू मग त्याने तांदूळ पेरले शंभरपटीने त्यालाही तांदूळ मिळाले मग त्याने ते टाकीत टाकले. तिसरा शेतकरी आला त्यानेही तांदूळ पेरले आणि त्याला मिळालेले तांदूळ त्याने त्याच टाकीत टाकले. आता चौथा शेतकरी आला तो म्हणाला, ‘सगळेच तांदूळ पेरत आहेत मग आपण का पेरायचे, आपण गहू पेरू’. मग त्याने गहू पेरले. त्याला गहू मिळाले. त्याने ते गहू टाकीतच टाकले. आता तीन थर तांदळाचे आणि एक थर गव्हाचा. चौथ्या शेतकऱयानंतर पाचवा शेतकरी आला त्याने चौथ्याचा आदर्श घेऊन गहूच पिकवले आणि टाकीत टाकले. मग सहावा शेतकरी आला. त्याला काही हे पटले नाही. त्याने मात्र तांदूळ पिकवले आणि तांदूळ टाकीत टाकले. सातव्यानेही तांदूळच पिकवले आणि टाकीत टाकले. आता आला आठवा शेतकरी. आठवा शेतकरी तांदूळ पिकवत होता म्हणजेच सत्कर्म करत होता पण ते टाकीत टाकायला जागाच शिल्लक नव्हती मग त्याने टाकीचा तळ उघडला. पहिल्या शेतकऱयाने मेहनतीने उगवलेले तांदूळच आठव्या शेतकऱयाला मिळाले. म्हणजेच त्याने सत्कर्म केले त्याच्या पदरी चांगली फळं आली. यानंतर नववा शेतकरी आला तेव्हा त्यानेही तांदूळ पिकवले त्याला टाकीचा दुसरा थर जो तांदळानेच भरलेला होता तो मिळाला. यानंतर जो शेतकरी आला त्याने मात्र गहू पेरले म्हणजेच त्याने खूप वाईट कर्मे केली पण त्याच्या पदरी तिसऱया शेतकऱयाने ठेवलेले तांदूळच आले. म्हणजेच त्याने लोकांचे खूप वाईट केले पण त्यांच्याबाबतीत काही वाईट झाले नाही. याउलट त्याच्या नंतर आलेल्या शेतकऱयाने खूप चांगली कर्मे केली, खूप जणांना मदत केली, पण त्याच्या नशिबी गव्हाचा थर होता.
आपण प्रत्येक शेतकरी हा आपला एक जन्म समजूया. प्रत्येक जन्मात आपण गहू पेरले की तांदूळ हे आपल्याला काही कळणार नाहा। पण आपल्याच बाबतीत नेमके सगळे उलट कसे घडते किंवा आपल्या जवळची व्यक्ती कधी कुणाच्या भल्याचा विचार करत नाही, पाच पैशाची कुणाला मदत करत नाही पण त्याचे सगळे चांगलेच चालले आहे. तर हे असे का? याचे उत्तर तुम्हाला या उदाहरणाद्वारे नक्कीच मिळाले असेल. गेल्या जन्मी केलेल्या गोष्टी आपण बदलू शकत नाही, पण या जन्मात आपल्याला गहू पेरायचे आहेत की तांदूळ हे आपण नक्कीच ठरवू शकतो.
आता सत्कर्म म्हणजे काय? चांगले बोलणे, चांगले वागणे, चांगला विचार करणे, दान करणे…उद्या तुमची मुले किंवा तुमच्या आजूबाजूची माणसे चुकीचे वागत आहेत पण तुम्ही त्यांना बोलणे टाळता. कारण एखाद्याला वाईट बोलणे म्हणजेच वाईट कर्म करणे. मास्टर चोआ कोक सुई म्हणतात, हा विचार चुकीचा आहे. एखाद्याला चांगल्या मार्गावर आणण्यासाठी त्याला ओरडावे लागले, दोन शब्द वाईट बोलले गेले तर ते दुष्कर्म होत नाही कारण आपण करत असलेली कृती वाईट जरी असली तरी समोरच्या व्यक्तीवर त्याचे होणारे परिणाम चांगले असतात. सतत गोड गोड बोलणे म्हणजे सत्कर्म करणे नव्हे.
प्राणिक हीलिंगच्या ध्यानाला जेव्हा आम्ही एकत्र येतो तेव्हा असे बरेच विषय सिनिअर हीलर्सशी बोलले जातात. फक्त आपले वागणे बदलले म्हणजे सत्कर्म दुष्कर्म होत नाही आपल्या क्रियेवर समोरच्याची प्रतिक्रियाही कधी कधी सत्कर्म दुष्कर्म ठरवते. मास्टर चोआ कोक सुई म्हणतात, ज्या निसर्गात आपण जन्माला आलो त्या निसर्गाचे आपण नेहमीच देणे लागतो. दान करणे हे सगळय़ात मोठे पुण्य आहे. पण दान नेमके कोणाला करावे. निसर्ग नियमानुसार जे पेराल ते उगवते. म्हणून मास्टर नेहमी म्हणतात पैसा हवा तर पैसा पेरा. याचा शब्दशः अर्थ घेऊ नका. पैसा पेरा म्हणजेच पैसा दान करा. दान योग्य ठिकाणी झाले तरच त्याचे चांगले परिणाम आपल्याला मिळतात. आधी तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोणत्या प्रकारच्या समस्या आहेत ते बघा. जर शिक्षणामध्ये तुम्हाला अडचण येत असेल तर एखाद्या गरीब विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षणासाठी मदत करा. आपोआप तुमच्या शिक्षणात येणारे अडथळे दूर होतील. सतत आरोग्याच्या तक्रारी असतील तर एखाद्याला औषधासाठी मदत करा. म्हणजेच तुम्ही जे पेराल तेच उगवणार आहे. आपले महिन्यातील जे काही उत्पन्न असेल त्याचा 10 टक्के भाग तुम्ही योग्य ठिकाणी दान करा. जर तुम्हाला वारंवार दुर्भाग्यास सामोरे जावे लागत असेल, अडकून पडल्यासारखे वाटत असेल किंवा आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना होत असेल तर तुम्हास ध्यान-चिंतन करून त्या कर्मफळातून मिळणारा बोध घ्यायचा आहे. चांगली कृत्ये करून सत्कर्माचा साठा वाढवा. हुशारी आणि मेहनतीने आपण आपली परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला पाहिजे. कर्मफळातून बोध घेऊन शिकण्याजोगे शिकून, सत्कर्म करून, स्वकष्टाने हुशारीने तुम्ही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तिला अनुकूल करू शकता. आपल्या नकारात्मक कर्माच्या परिणामातून बोध घेऊन, ते भोगून, त्यावर सत्कर्माने मात करून प्रत्येक जण स्वतःला पवित्र करीत आपली आंतरिक शक्ती आणि आत्मबोध वाढवू शकतो.
आज्ञा अभिषेक कोयंडे