वार्ताहर / किणये
कर्ले येथे गवत गंजीला आग लागून शेतकऱयाचे सुमारे 75 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत गवत गंजी जळून खाक झाली. हा प्रकार शनिवारी दुपारी दोनच्या दरम्यान घडला असून आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही.
रामू विठ्ठल खेमणाळकर यांनी आपल्या घरच्या पाठीमागील परसात जनावरांसाठी सुका चारा म्हणून गवत गंजी ठेवली होती. या गंजीत 9 ट्रक्टर पिंजर होते. शनिवारी दुपारी अचानक गवत गंजीला आग लागली. यामुळे गावातील नागरिकांची एकच तारांबळ उडाली. दुपारच्या वेळेला आग लागल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. गावातील विठ्ठल गोवेकर यांच्या हस्ते कूपनलिकेचे पाणी सोडून आग विझविण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी केला. तोपर्यंत अग्निशमन दलाच्या वाहनाला बोलावून घेण्यात आले. दोन बंबातील पाणी फवारणी करून आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र तोपर्यंत गवत गंजी पूर्णपणे जळून खाक झाली होती.
रामू खेमणाळकर यांची 10 ते 12 जनावरे आहेत. जनावरांचा सुका चाराच जळून खाक झाल्यामुळे खेमणाळकर हे शेतकरी हतबल झाले आहेत.
तलाठी बुदीहाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सदर शेतकऱयाला नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱयांतून होत आहे..