वाहतुकीसाठी रस्ता धोकादायक : काही भाग गेला वाहून : प्रशासनाचे मात्र दोन वर्षांपासून दुर्लक्ष
वार्ताहर / किणये
कर्ले-बेळवट्टी या संपर्क रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याचा काही भाग वाहून गेला आहे. यामुळे कर्ले-बेळवट्टी या दोन गावांचा संपर्क तुटण्याच्या मार्गावर आहे.
गेल्या दोन वर्षांपासून रस्त्याची अशी परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाचे रस्त्याकडे साफ दुर्लक्ष झाल्याच्या तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत.
रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. काही ठिकाणी रस्त्याचा भाग वाहून गेला आहे. सध्या या रस्त्यावरून बैलगाडी जाणेही मुश्कील बनले आहे. कर्ले-बेळवट्टी हा संपर्क रस्ता कर्ले, बेळवट्टी, बिजगर्णी, कावळेवाडी, जानेवाडी, बहाद्दरवाडी, राकसकोप आदी गावांसाठी महत्त्वाचा आहे. यामुळे या रस्त्यावरून वाहतूक होत असते. पण सध्याची परिस्थिती पाहता वाहतुकीसाठी हा रस्ता जीवघेणा ठरू शकतो.
बेळवट्टी व कर्ले गावातील शेतकरी याच रस्त्यावरून आपल्या शेतशिवाराकडे जात असतात. पण रस्त्यावरील खड्डय़ांमुळे तेही वैतागून गेले आहेत. गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याचा काही भाग वाहून गेला आहे. यामुळे रस्ता वाहून गेलेल्या ठिकाणी भले मोठे भगदाड पडले आहे. रस्ता वाहून गेल्याने शेतकऱयांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.