प्रतिनिधी / सातारा :
सातारा शहराची गेल्या काही महिन्यांपुर्वीच हद्दवाढ झाली. शहरालगतची अनेक गावांचा-उपनगरांचा समावेश हा पालिकेत करण्यात आला. मात्र हद्दवाढ झाली शहर विस्तारलं पण विस्तारलेल्या शहरालगतच्या गावांच्या समस्या अजूनही ‘जैसे थे’च आहेत. शहराला लागूनच असणाऱया कोंडवे ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या दिव्यनगरी भागात अंतर्गत रस्त्यांचा डांबरीकरणाचा प्रश्न खुप दिवसांपासून शासन दरबारी प्रलंबित असून ग्रामस्थांचा पाठपुरावा हा सुरु आहे. दरवर्षी येथील नागरिकांकडून कर गोळा केला जातो मात्र येथील नागरिकांना सुविधा कोण देणार, असा प्रश्न येथील ग्रामस्थ विचारत आहे. खासदार उदयनराजेंनी दत्तक घेतलेल्या गावातच ग्रामपंचायत पदाधिकारी दिव्यनगरीकरांशी दुजाभाव करत आहेत.
दिव्यनगरी शहरालगतच्या कोंडवे ग्रामपंचायत हद्दीतील वसाहत कित्येक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. येथील शिवकृपा कॉलनी, गोवर्धन कॉलनी, आदर्श कॉलनी, महालक्ष्मी कॉलनी, नंदादीप कॉलनी, वृदांवन कॉलनी, येथे अंतर्गत रस्ते, कचरा व्यवस्थापन पथदिवे यांसारख्या सोयीसुविधांची येथे वाणवा पहायला मिळत आहे. पावसात चिखल तुडवत त्याच चिखलाच्या रस्त्यांमधून वाहनधारकांची होणारी कसरत अपघातांना निमंत्रण देत असल्याने संबंधित विभागाने तत्काळ दिव्यनगरी येथील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
ग्रामपंचायतीत दरवर्षी दिला जातो अर्ज
दिव्यनगरी येथील नंदादीप हौसिंग सोसायटीमध्ये दक्षिणेपासून उत्तरेकडे एक 9 मीटर रुंदीचा रस्ता आहे. सदर रस्ता साधारणपणे 100 ते 150 मीटर लांबीचा आहे. सदर रस्ता डांबरीकरण करण्यासाठी दरवर्षी सरपंच, ग्रामपंचायत कोंडवे यांना वारंवार अर्ज करून सुध्दा सदर रस्त्याचे डांबरीकरण होत नाही. पावसाळयामध्ये चिखलामध्ये कोठून दुचाकी गाडी काढावी हे समजत नाही. यापूर्वी चिखलामुळे अपघात हे घडले आहेत.