बळीराजा वैतागला : ग्राम पंचायतीने घेतले झोपेचे सोंग, ग्रामस्थ-पर्यावरण प्रेमींतून तीव्र नाराजी
वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक
महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील सांडपाणी आणि कचरा कंग्राळी बुद्रुक ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात सोडले जात आहे. त्यामुळे कंग्राळी बुद्रुक ग्रामस्थ अक्षरशः वैतागले आहेत. गावची अवस्था गंभीर झाली आहे. तेव्हा या प्रकाराला आता तीव्र विरोध करणे गरजेचे असून एकजुटीने त्या विरोधात आवाज उठवावा, अशी मागणी ग्रामस्थ आणि पर्यावरण प्रेमींतून होत आहे. कर महानगरपालिकेच्या तिजारीत आणि मनपाच्या हद्दीतील कचरा आणि सांडपाणी कंग्राळी बी.के.च्या हद्दीत अशी अवस्था निर्माण झाली आहे. तेव्हा याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
कंग्राळी बुद्रुक गावच्या दक्षिणेला असलेली शाहूनगर, अजमनगर, नेहरुनगर, केएलई इस्पितळ यासह इतर नगर व औद्योगिक वसाहतीचे सांडपाणी कंग्राळी बुद्रुक शिवारात सोडले जात आहे. त्यामुळे शिवारात जाणे कठीण झाले आहे. शेतकऱयांना दरवषीच याचा मोठा फटका बसत आहे. या प्रकारांमुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. महापालिका तसेच इतर कोणालाच याचे सोयरसुतक नाही. या प्रकारामुळे मात्र बळीराजा मोठय़ा संकटात सापडला आहे. तेव्हा तातडीने येणारे हे पाणी थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
महानगरपालिका या उपनगरांतील घरांचा कर घेते. मात्र त्या उपनगरांची व्यवस्था करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. सांडपाणी शेतीत येत असल्यामुळे शेतीचा पोत खराब होत आहे. 40 ते 50 वर्षांपूर्वी हे सर्व पाणी कंग्राळी खुर्द नाल्यातून मार्कंडेय नदीला जात होते. परंतु 25 वर्षांपूर्वी महापालिकेने ते पाणी बंद केले. त्यामुळे संपूर्ण पाणी कंग्राळी बुद्रुककडे वळले आहे. या दूषित पाण्याबद्दल आता साऱयांनीच आवाज उठविण्याची गरज निर्माण झाली आहे.
ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष
ग्राम पंचायतीनेही याकडे दुर्लक्ष केले आहे. वास्तविक ग्राम पंचायतीने याबाबत कायदेशीर लढाई लढणेही गरजेचे आहे. मात्र केवळ बघ्याची भूमिका घेतली गेली आहे, असा आरोप नागरिकांतून होत आहे. सध्या शेतकऱयांनी स्वखर्चाने कालवा काढून त्या पाण्याला वाट मोकळी करुन देण्याचा प्रयत्न केला आहे. ग्राम पंचायतही यासाठी निधी खर्च करत आहे. मात्र मनपा केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.