वार्ताहर / सावंतवाडी:
अंबरनाथ एमआयडीसी परिसरात चिखलोली धरणात मित्रांसोबत पोहोण्यासाठी गेलेला महादेव उर्फ वसंत प्रभाकर मेस्त्राr (वय 17) हा इयत्ता बारावीत शिकणारा विद्यार्थी धरणात बुडून मृत्युमुखी पडला. तो मूळ सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त गणशेळवाडी येथील रहिवासी आहे. त्याच्यासोबत आणखी दोघे मित्र होते. त्यातील एकाचा बुडून मृत्यू झाला आहे. तो अंबरनाथ येथीलच आहे.
दोन दिवसांपूर्वी रविवारी दुपारच्या सुमारास अंबरनाथ महादेव टेकडीजवळ हे तिघे मित्र पोहण्यासाठी गेले होते. महादेव आणि सार्थक यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते धरणाच्या पाण्यात बुडाले. त्यानंतर त्यांचा शोध सुरू होता. मात्र दोन दिवस त्यांचा शोध लागत नव्हता. मंगळवारी सकाळी धरणाच्या पाण्याच्या या दोघांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला.
मूळ कलंबिस्त येथील प्रभाकर वसंत मेस्त्राr व त्यांचे कुटुंबीय मुंबईत अंबरनाथ येथे राहतात. त्यांना दोन मुली व महादेव हा एकुलता एक मुलगा. सुतारकाम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. वडिलांच्या सुतारकाम व्यवसायाला महादेवचा हातभार लागत होता. महादेव हा बारावीत कला शाखेत शिकत होता. तो शांत स्वभावाचा होता. मुलाचा मृतदेह पाहून त्याचे वडील, आई व कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटणारा होता.