उत्तर रत्नागिरीतील 4 हजार ग्राहकांना फटका, आठजणांची पोलिसांत तक्रार
प्रतिनिधी/ चिपळूण
कलकाम रियल इन्फ्रा इंडिया लिमिटेड या कंपनीने गाशा गुंडाळल्याने उत्तर रत्नागिरीतील सुमारे चार हजार एजंट आणि ग्राहकांची फसवणूक झाली आहे. यासंदर्भात आठजणांनी बुधवारी येथील पोलीस स्थानकात तक्रार अर्ज दाखल केला आहे. शिवाय 61 एजंटांनी प्रजासत्ताक दिनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱयांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, या कंपनीसाठी ग्राहकांकडून पैसे घेऊन वेगवेगळय़ा स्कीममध्ये गुंतवणूक केली आहे. मात्र, सदर कंपनीने 2016 पासून कंपनीने गुंतवलेले पैसे परत केले नसून कमिशनही दिलेले नाही. कंपनी चेअरमन विष्णू दळवी, संचालक विजय सुपेकर, सुनील वांद्रे, प्रकल्प संचालक महेंद्र संसारे, प्रशासकीय अधिकारी दिलीप शिंदे यांनी आम्हा सर्वांची सुमारे 17 कोटी 33 लाख रूपयांची फसवणूक केलेली आहे. पैसे मिळण्यासाठी कंपनीच्या संबंधित जबाबदार व्यक्तींबरोबर भेटी घेऊन चर्चाही करण्यात आली. मात्र प्रत्येकवेळी खोटय़ा आश्वासनाशिवाय पदरात काहीच पडलेले नाही.
दरम्यान, कंपनीच्या जबाबदार व्यक्तीने कलपार्क, कलावती व सध्या सुरू असलेली तनिष्का अशा वेगवेगळय़ा नावाने कंपन्यांची स्थापना केली आहे. दामदुप्पट परताव्याची आश्वासने देत जनतेकडून रक्कम गोळा करत पुन्हा फसवणूक केली जात आहे. फसवणूक झाल्यानंतरही संबंधित दुर्लक्ष करीत असल्याने 26 रोजी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे या निवेदनात नमूद केले आहे.
या निवेदनावर मानाजी आयरे, नवनीत जाधव, संतोष भाटकर, माधवी भोसले, स्नेहा कदम, स्वाती कदम, अशोक तेवरे, अक्षता कदम, ज्ञानेश्वर नाझरे, रामचंद्र नाझरे, सदानंद बोलाडे, संतोष भाटकर, विलास जंगम, नरेश बैकर, बृहस्पती महाकाळ यांच्यासह 61 जणांच्या स्वाक्षऱया आहेत.
उपोषणाला परवानगी नाकारली
प्रजासत्ताकदिनी तहसील कार्यालयाने उपोषणाला परवानगी नाकारली आहे. दिलेल्या तक्रारीच्या अनुशंगाने मागणीवर कार्यवाही करण्याच्यादृष्टीने कलकाम रियल इन्फ्रा इंडिया लिमिटेडच्या नवीमुंबई येथील कार्यालयाकडे कळवण्यात आलेले आहे. सदर प्रकरण समोपचाराने सोडवावे असे तहसीलदार यांनी सदर पत्रात नमूद केले आहे.
आमदार निकम यांचीही चर्चा
सदर कंपनीच्या जबाबदार व्यक्तीना संपर्क साधल्यानंतर उत्तरच देत नसल्याने यासंदर्भात एजंटनी आमदार शेखर निकम यांची भेट घेतली. यावेळी एजंटनी दिलेल्या क्रमांकावर निकम यांनी संपर्क साधला असता 10 जानेवारीची मुदत दिली गेली होती. मात्र हेही आश्वासन पाळले गेले नसल्याचे सबंधितांचे म्हणणे आहे.
पोलीस स्थानकात धाव
कंपनीचे कार्यालय हे चिपळुणात होते. गुंतवणूक केलेल्या सुमारे 4 हजाराहून अधिकजणांची फसवणूक झाली आहे. बुधवारी आठजणांनी आपली फसवणूक झाल्याचा तक्रार अर्ज येथील पोलीस स्थानकात दिला आहे. यामध्ये चिपळूण, गुहागर आणि दापोलीतील तक्रारदारांचा समावेश आहे. दरम्यान, यासंदर्भात कंपनी व्यवस्थापन आणि संचालकांकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.