हंगामात लांबलेल्या पावसाचा परिणाम
प्रतिनिधी/ रत्नागिरी
आंबा खवय्यांसाठी एक चिंतेत टाकणारी बातमी आहे. यंदा फळांचा राजा हापूस खाण्यासाठी खवय्यांना वाट पहावी लागणार आहे. रत्नागिरी जिह्यात थंडीला सुरुवात झाली, मात्र अजूनही वातावरणात पोषक थंडीची प्रतीक्षा लागून राहिली आहे. वातावरण बदलामुळे आंबा मोहोरासाठी पोषक वातावरण नाही. पण या हंगामात लांबलेल्या पावसामुळे झाडांना पालवी आल्याने यंदाही हापूसचा हंगाम लांबण्याची शक्यता आहे. झाडांना आलेली पालवी टिकवून ठेवण्यासाठी बागायतदारांचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
यंदा पावसाचे प्रमाण सुरुवातीपासून समाधानकारक राहिले. मात्र अवकाळी पावसाने ऑक्टोबरपर्यंत हजेरी लावली. भातशेतीच्या दृष्टीने अखेरचा पाऊस अडचणीचा ठरला. अवकाळी पावसाने शेतकऱयांना अडचणीत आणल्याचे चित्र होते. पाऊस लांबल्याने आंबा हंगाम यंदा लांबणीवर जाण्याची अंदाज बांधला जात आहे. पाऊस उशिरापर्यंत राहिल्याने आंबा कलमांना आता पालवी फुटली आहे. मोठय़ा प्रमाणात झाडांना पालवी आली आहे. कलमांना आलेली पालवी जाऊन त्यामधून मोहोर बाहेर येण्यास काही कालावधी जावा लागणार आहे. असे असले तरी काही झाडांवर किरकोळ प्रमाणात मोहोर दिसतो आहे. मात्र बहुतांशी झाडांना पालवी फुटली आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम लांबण्याची शक्यता आंबा बागायतदार व्यक्त करत करत आहेत.
आंबा हंगाम लांबणार
सध्याचे चित्र पाहता सुमारे 90 टक्के आंबा कलमांना मोठय़ा प्रमाणात पालवी फुटली आहे. त्यामुळे मोहोर उशिरा येऊन हापूसलाही विलंब होईल. त्यामुळे हापूसला दर मिळणार नाही. सध्या पालवी आलेली फांदी जोपर्यंत जुनी होत नाही, तोपर्यंत तिला मोहोर येणार नाही. त्यामुळे यावर्षी आंबा हंगाम पुढे जाईल,असं चित्र आहे.
-टी. एस. घवाळी, बागायतदार-रत्नागिरी
जिल्हय़ामध्ये ढगाळ वातावरण
मध्य भारतातील कमी दाबक्षेत्रामुळे विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडल्यामुळे शनिवारी जिह्यामध्ये दिवसभर ढगाळ वातावरण दिसल़े हवामान खात्याने कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज वर्तवला आह़े दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे हवामानात सुखद गारवा होत़ा शनिवारी जिह्याच्या किमान सरासरीच्या तुलनेत वाढ झाल्याचे मुंबई वेधशाळेने म्हटले आह़े जिह्याचे तापमान 23.7 इतके नोंदवण्यात आले आहे. 24 तासात कोकणातील आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आह़े मात्र पावसाची कोणतीही शक्यता नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आह़े शहरासह जिह्यातील तापमानात रात्रीच्या वेळी घट होत असल्याने हापूस बागायततदार सुखावले आहेत़ थंडीच्या आगमनामुळे सुमारे 90 टक्के हापूसच्या झाडांना पालवी फुटली आह़े नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात अचानक थंडी गायब झाल्याने व ढगाळ वातावरणामुळे संगमेश्वरातील शेतकरी चिंतेत सापडला आहे.