ऑनलाईन टीम / पुणे :
कलाकार शरीररुपाने निर्वतले तरी कलाकार त्याच्या कलेतून आणि कलाकृतीच्या माध्यमातून अमर होतो. त्याची कला सदैव आपल्या मनात रुंजी घालत असते, असे मत ज्येष्ठ व्हायोलिनवादक पंडित अतुलकुमार उपाध्ये यांनी व्यक्त केले.
भारतीय अभिजात रागसंगीतामध्ये मेवाती घराण्याच्या गायकीची धुरा समर्थपणे वाहिलेले संगीतमार्तंड पंडित जसराज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ललित कला केंद्र ( (गुरूकुल), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे भीमसेन जोशी अध्यासन आणि संवाद,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष सांगितीक श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधील संत ज्ञानेश्वर सभागृहात करण्यात आले होते, त्यावेळी उपाध्ये बोलत होते.
पंडित अतुलकुमार उपाध्ये म्हणाले की, पंडित जसराज यांचा स्वर प्रासादिक होता. मेवाती घराण्याची पंरपरा पंडित जसराज यांनी चालवली. पंडित जसराज यांची गायनाची मांडणी अतिशय सुसंबंध होती आणि त्यात एक नजाकत होती. पंडित भिमसेन जोशी, पंडित वसंतराव देशपांडे, अभिषेकी बुवा यांसारख्या दिग्गजांच्या सान्निध्यात आम्ही वाढलो. या सान्निध्यामुळेच आमची देखील कला समृद्ध झाली. पंडित जसराज हे मूळ तबलावादक होते. त्यांनी एका गायकाच्या स्वरांवर मत प्रदर्शित करतातच दुसऱ्या एका कलाकाराने त्यांना ”तुम तो मरी हुॅयी चमडी बजांते हो, तुम्हे क्या मालूम गंधार के बारे में” असा खोचक टोमणा मारला. ह्या टोमण्यामुळेच पंडित जसराज पेटून उठले आणि त्यांनी त्या दिवसापासून तपस्या करुन गायन क्षेत्रात स्वतःचे वेगळ अढळ स्थान निर्माण केले. जयपूर घराणे, किराणा घराणे म्हणजे हा एक सांगितीक विचार आहे आणि हा विचार पुढे नेणारी पिढी तयार झाली की घराण्याची पंरपरा सुरु होते. या सर्व घराण्यात भविष्यात मेवाती घराण्याला देखील मानणारी पिढी तयार होईल, यात शंका नाही. पंडित जसराज यांनी त्यांच्या जागतिक आणि दूरदृष्टीमुळे संगीत जगतात मोठे योगदान दिले आहे.
प्रसिद्ध शास्त्रीय गायक श्रीनिवास भीमसेन जोशी म्हणाले की, वडिल भिमसेन जोशी यांच्यामुळे पंडित जसराज यांना जवळून अनुभवण्याचा योग आला. गायन क्षेत्रात अनेक कलाकार साधना करीत असतात. पंरतू, परतत्वस्पर्श काहीच कलाकारांना प्राप्त होतो. परतत्वस्पर्श लाभलेल्या मोजक्या काही कलारकारांमध्ये पंडित जसराज यांचे नाव अग्रक्रमाने येते.