प्रतिनिधी / बेळगाव
आज नातेसंबंध बदलत आहेत. माणूस माणसांपासून बाजूला जात आहे. मोबाईलमुळे देहाने आपण जवळ आहोत, असे वाटत असले तरी मनाने आपण एकत्र आहोत का? हा प्रश्न आहे. ही पोकळी दूर करण्याचे काम फक्त कलाच करू शकते आणि आत्मिक समाधान देवू शकते, असे विचार चित्रपट समीक्षक, दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांनी व्यक्त केले.
वरेरकर नाटय़ संघातर्फे चित्रमहषी के. बी. कुलकर्णी यांच्या जयंतीनिमित्त चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. याच निमित्ताने ‘के. बी. कुलकर्णी ः एक परंपरा’ या विषयावर कणकवलीचे चित्रकार नामानंद मोडक यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी चंद्रकांत जोशी होते. व्यासपीठावर संघाचे अध्यक्ष किरण ठाकुर, सचिव जगदीश कुंटे, मुंबईचे आर्किटेक्ट जयवंत नाईक, के.बीं.च्या स्नुषा प्रभा कुलकर्णी उपस्थित होत्या.
चंद्रकांत जोशी म्हणाले, भारतीय कला, परंपरा, संस्कृती, व्यवहारामध्ये चित्रकला आणि शिल्पकला पार्थिव कला मानल्या जातात. इतर कला क्रियाशील आहेत. कारण प्रेक्षक किंवा रसिकांना त्याचा थेट आस्वाद घेता येतो. पण चित्र आणि शिल्प पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला त्याचा आस्वाद घेता येत नाही. हा आस्वाद घेताना आपण विशिष्टय़ पद्धतीने त्या कलेशी गुंतले जातो, तेंव्हा सुसंस्कृतीक नागरिक घडतो.
चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर किरण ठाकुर म्हणाले, चित्रकार अनेक आहेत. पण काहींची चित्रे अजरामर होतात. याचे कारण त्यांनी अनुभवाचे शिक्षण घेतलेले असते. के. बी.ंचा अनुभव फार मोठा होता. आज चित्रकार अनेक आहेत, चित्रमहषी अनेक शिष्य तयार करतात. पण चित्रमहर्षींची जागा घेतील असे विद्यार्थी घडणे आवश्यक आहे.
सुसज्ज आर्ट गॅलरी उभारणार
चित्रकार क्रांती करू शकतो इतकी कुवत त्याच्यामध्ये नक्की आहे. बेळगाव हे तर चित्रकलेसाठी पोषक असे गाव आहे. या गावात आर्ट गॅलरी व्हावी यासाठी सुभाष जाधव महापौर असताना जागा मंजूर झाली. परंतु नंतर ही जागा रद्द झाली. तथापि आपण आता एक सुसज्ज आर्ट गॅलरी उभारत असून त्याला के. बी. कुलकर्णींचेच नाव दिले जाईल. येथे बेळगावच्याच चित्रकारांची चित्रे जतन केली जातील. गोव्याच्या कला अकादमीप्रमाणे बेळगावच्या आर्ट गॅलरीचे रूप असेल, असेही किरण ठाकुर म्हणाले.
नामानंद मोडक यांनी के. बीं.चा सहवास ज्यांना लाभला ते भाग्यवान असे सांगून केवळ त्यांच्या पुण्याई आणि नावावर आपल्याला पुढे जाता येत नाही. चित्रकारांना बोलण्याची संधी मिळत नाही. त्यांचे संमेलन होत नाही. साहित्य आणि नाटय़ संमेलनामध्ये त्यांचा उपयोग फक्त सजावटीसाठी होतो. पण परिसंवादात ते नसतात याकडे लक्ष वेधले.
कलेत केवळ कारागिरी आणि अभिव्यक्ती असते. विषय निवडताना तो आशयपूर्ण होईल हे पाहणेसुद्धा महत्त्वाचे आहे. माणसाच्या जीवनशैलीचा वेध कलेने घ्यायला हवा. समाजाची भौतिक समृद्धी म्हणजे मूल्यमापन नव्हे तर अनुकरणातून अस्सल कला कधीच निर्माण होत नाही. आज संपर्क माध्यमांमुळे माणसे एकाकी आहेत. कलाकाराने, चित्रकाराने संवेदनशील राहून असहिष्णूता टाळून आशयासह संस्कृती जोपासली पाहिजे. कारण चित्रकार क्रांतीची बिजे रोवतो, असे नामानंद मोडक म्हणाले.
प्रारंभी रोपाला पाणी घालून प्रदर्शनाचे उद्घाटन किरण ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले. विनय कुलकर्णी, श्रुती कुलकर्णी, श्रेया कुलकर्णी व मनीषा सुभेदार यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ दिले. अंकिता कदम यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालन वृषाली मराठे यांनी केले. आभार प्रदर्शन जगदीश कुंटे यांनी केले.
चित्रकारांना पारितोषिकांचे वितरण गतवर्षी ललित कला अकादमी नवी दिल्लीतर्फे चित्रकारांना 5 हजार रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले होते. गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात 21 चित्रकारांना प्रत्येकी 5 हजार रुपये देण्यात आले. चित्रकारांना जयवंत नाईक व प्रभा कुलकर्णी यांच्या हस्ते रोख पारितोषिके देण्यात आली.