लसीकरण अल्प असलेल्या जिल्हय़ांच्या अधिकाऱयांना पंतप्रधान मोदींची सूचना
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना लसीकरणाचे प्रमाण कमी असलेल्या देशभरातील 40 जिल्हय़ांच्या जिल्हाधिकाऱयांशी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही चर्चा झाली. पंतप्रधान मोदी बुधवारीच ग्लासगोमधून परतले. त्यानंतर त्वरित ही बैठक पार पडली. ज्या जिल्हय़ांमध्ये 50 टक्क्यांहून कमी लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे आणि जेथे दुसरा डोस घेण्याचे प्रमाण अत्यल्प आहे, अशा जिल्हय़ांचा समावेश बैठकीत होता.
आपल्या जिल्हय़ांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी का आहे, याचा शोध घेण्याचे आवाहन त्यांनी जिल्हाधिकाऱयांना केले. लोकांच्या मनात लसीसंबंधी असणारे गैरसमज दूर करण्यासाठी कल्पक उपायांचा अवलंब करण्याची सूचना त्यांनी केली. तसेच धार्मिक नेत्यांचे साहाय्य घेऊन त्यांनाही लसीकरणाच्या अभियानात सहभागी करुन घ्या. त्यांना मानणारे लोक त्यामुळे लसीकरणासाठी तयार होतील. लोकांच्या मनातील भीती नाहीशी होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
100 वर्षांमध्ये प्रथमच
कोरोना उद्रेक गेल्या 100 वर्षांमधील पहिला देशव्यापी उद्रेक आहे. या काळात देशाला कठीण आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र, आपण सर्वांनी धीर न सोडता यांवर उपाय शोधला आहे. आपल्यालाही आपल्या जिल्हय़ांमध्ये अशाच प्रकारे नवे मार्ग शोधावयास हवेत. लोकांना लस घेण्यासाठी उद्युक्त करावयास हवे. लसीकरण हाच कोरोना नियंत्रणाचा सर्वोत्तम मार्ग आहे, हे त्यांनी स्पष्ट केले.
आता घराघरांमधून लस
पंतप्रधान मोदींनी या बैठकीत घरोघरी जाऊन लस देण्याच्या मोहिमेचे सुतोवाच केले. आतापर्यंत आपण लोकांना लसीकरण केंद्रापर्यंत जाण्यास प्रोत्साहित केले. यापुढचा टप्पा आता प्रत्येकाच्या घरी जाऊन लस देणे हा आहे. ज्यांनी आतापर्यंत लस घेतलेली नाही, त्यांच्या घरांपर्यंत गेले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
11,903 नवे रुग्ण
मंगळवार ते बुधवार अशा 24 तासांमध्ये देशात नवे 11,903 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तसेच बरे झालेल्या रुग्णांची संख्या यापेक्षा जास्त असल्याने उपचाराधीन रुग्णसंख्या आणखी कमी झाली आहे