ऑनलाईन टीम / मुंबई :
कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून मुंबईत काम करणाऱ्यांना कल्याण-डोंबिवली शहरात येण्यास प्रवेशबंदी करण्यात आली होती. परंतु आज एक पत्रक काढून या निर्णयास पालिकेने तूर्तास स्थगिती दिली आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या तसंच विविध ठिकाणी कामाला जाणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांची राहण्याची व्यवस्था मुंबईत करण्याची विनंती पालिकेने केली होती.
कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले होते. त्यामुळे कुटुंबीयांना कोरोनाची लागण होऊ नये तसेच त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने असा निर्णय घेण्यात आला होता. आठ मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार होती. मात्र आता या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांची माहिती कल्याण-डोंबिवली महापालिकेला सादर करण्याची विनंतीही करण्यात आली आहे. ही माहिती पालिकेकडून मुंबई महानगरपालिकेला सादर केले जाईल असे पत्रकात म्हटले आहे.